पुर्णा नदीच्या पुरात शेतकऱ्याच्या २० शेळ्या वाहुन गेल्या.!
कात्नेश्वर शिवारातील घटना; सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान..
पुर्णा ता.२८(प्रतिनिधी);20 goats of a farmer from Katneshwar were washed away in the Purna river floodपुर्णा नदीच्या पुरात एका व शेतकऱ्यांच्या २० शेळ्या पाण्यासोबत वाहुन गेल्याची घटना तालुक्यातील मौजे कातनेश्वर येथे शनिवारी (ता.२७) रोजी सायं ५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेत शेतकऱ्याचे सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.
पुर्णा तालुक्यातील मौजे कात्नेश्वर येथील शेतकरी पांडुरंग मारोतराव चापके यांचे पुर्णा नदीपात्रालगत शेती आहे. शेतीसह ते जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करतात.त्यांनी ५० ते ६० शेळ्या पाळल्या आहेत.मागील काही दिवसां पासून जिल्ह्यासह तालुक्यात सर्वत्र अतीवृष्टीचा पाऊस पडतो आहे.सर्व नद्या नाले,ओढे, धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.शनिवारी (ता.२७) रोजी पांडुरंग चापके हे नदी धोकादायक पातळीवर वाहत असल्याने शेतातील शेळ्या गावाकडे परत आणण्यासाठी गेले दरम्यान पुर्णा नदीला जाऊन मिळणारा ओढ्याला पुर आला धोकादायक पातळीवर पात्रातील वाढले.पाण्यात शेळ्या सैरभैर झाल्या पाण्याचा अंदाजा न आल्याने शेळ्या वाहुन जात असताना त्यांनी आरडाओरड केली.दरम्यान त्यांच्या मदतीला परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली.परंतु दुर्दैवाने यातील २० शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या उर्वरित शेळ्या सह चापके यांना वाचविण्यात ग्रामस्थ शेतक-यांना यश आले आहे.दरम्यान शेळ्या वाहुन गेल्याने पांडुरंग चापके यांचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.घटनेची माहीती पोलीस पाटील ज्ञानोबा काटकर यांनी महसूल अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांना दिली आहे.

तालुक्यातील कात्नेश्वर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कच्ची घरे कोसळली आहेत. जवळपास १० ते १२ नागरिकांची मातीची घरे ढासळल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. यावेळी सरपंच कान्होपात्रा चापके, उपसरपंच रामेश्वर चापके, ग्रामसेवक केशव जवंजाळ आणि मंडळ अधिकारी सुदाम खुणे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत.












