बँक ऑफ महाराष्ट्रची कनेक्टिव्हिटी ५ दिवसां पासून गुल..
पूर्णा शाखेचे कामकाज खोळंब्यामुळे ग्राहक हैराण: तातडीने नेटवर्क सुरू करण्याची मागणी
पूर्णा (प्रतिनिधी)
येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची कनेक्टिव्हिटी मागील पाच दिवसांपासून गुल झाल्याने बँकेचे कामकाज ठप्प झाले आहे.याचा फटका शेकडो ग्राहकांना बसला असून, दैनंदिन व्यवहार बंद पडल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.बंद पडलेली कनेक्टिव्हिटी सुरुळीत करावी अशी मागणी होत आहे.
पूर्णा शहरातील हजारो कर्मचारी, व्यावसायीक ,पेन्शन धारक, सर्वसामान्य नागरिक खातेदार असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची कनेक्टिव्हिटी शुक्रवार २३ पासून गुल झाली आहे.यामुळे बँकेचे कोअर बँकिंग सिस्टीम पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे रोकड रक्कम जमा करणे, पैसे काढणे, ऑनलाइन व्यवहार, पासबुक अपडेट, एटीएम सेवा अशा सर्व सुविधा ठप्प झाल्या आहेत.या समस्येमुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना रोजच रांगेत उभं राहून खाली हाताने परत जावं लागतं आहे. वृद्ध, महिलांना आणि व्यवसायिक वर्गाला याचा विशेष त्रास होत आहे बँके समोर “नेटवर्क नाही”असे बोर्ड झळकताना पहावयास मिळत आहे. ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एक ग्राहक बोलताना म्हणाले, “आम्ही रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत बँकेत चकरा मारतोय. पण ना पैसे काढता येत आहेत, ना कोणताही व्यवहार करता येतो. इतकी मोठी बँक असूनही तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवल्या जात नाहीत, ही गंभीर बाब आहे.संबंधित बँक व्यवस्थापनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावे आणि तांत्रिक अडचणी दूर करून बँक व्यवहार सुरळीत करावेत, अशी जोरदार मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
ग्राहकांनी संयम बाळगावा…
मागील पाच दिवसांपासून एअरटेलचे फायबर कट झाल्यामुळे बँकेला इंटरनेट सेवा मिळत नाही. आम्ही संबंधित नेटवर्क कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधत आहोत. मात्र, त्यांनी केवळ ‘काम सुरू आहे’ असे सांगून वेळ मारून नेत आहेत.बॅकेचे नेटवर्क कधी पुर्वरत होईल हे नक्की सांगता येणार नाही. त्यामुळे आमच्यासह ग्राहकही अडचणीत आले आहेत.”या तांत्रिक अडचणीमुळे बँकेत येणाऱ्या शेकडो ग्राहकांचे रोजचे व्यवहार खोळंबले असून, अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ग्राहकांना होत असलेल्या अडचणी बाबत बँक प्रशासन कृतघ्न आहे.ग्राहकांनी संयम बाळगुन बँक प्रशासनाला सहकार्य करावे.
–चंद्रकांत कच्छवे शाखाअधिकारी. (बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पूर्णा)