जयंती विशेष;भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक
संपादकीय(प्रकाश वर्मा) ३० एप्रिल २०२५
Bhagwan Parshuram Jayanti २०२५:अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: । इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥ अर्थ : चारही वेद मुखोद्गत करून आहेत ब्राह्मतेज जोपासणारा व क्षात्रतेजाची खूण म्हणून पाठीवर धनुष्यबाण बाळगणारा भगवान परशुराम विरोधकांना शापाने अथवा शस्त्राने हरवील. भगवान परशुरामांच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते.
श्रीविष्णूचा सहावे अवतार परशुराम उपास्यदेवता म्हणून पुजले जातात. परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला. वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी परशुराम जयंती उत्सव म्हणून साजरी केली जाते. परशुरामांच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही. भगवान परशुराम हे शत्रूचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र या दोन्ही तेजांचा उत्कृष्ट उपयोग करणारे श्रेष्ठतम योद्ध्याचे उत्तम उदाहरण आहे.
१. सप्तचिरंजिवांपैकी एक
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषण:। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ॥ अर्थ : अश्वत्थामा, बळी, महर्षि व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत. परशुरामाने काळावर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. प्रातःसमयी त्याचे स्मरण केल्याने पुण्य प्राप्त होते.
२. श्रीविष्णूचा सहावा अवतार
सत्ययुगात मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह आणि वामन हे श्रीविष्णूचे पाच अवतार झाले. त्रेतायुगाच्या प्रारंभी महर्षी भृगु यांच्या गोत्रात जामदग्नेय कुळात महर्षि जमदग्नी आणि रेणुकामाता यांच्या पोटी श्रीविष्णूने सहावा अवतार घेतला. त्याचे नाव परशुराम होते. भार्गवगोत्री असल्याने त्यास भार्गवराम असेही संबोधले जात असे.
३. अपराजेय योद्धा असलेल्या कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा विनाश करण्यासाठी परशुरामाने केलेला अद्वितीय पराक्रम !
परशुरामाने तपश्चर्या करून सहस्रार्जुन कार्तविर्यापेक्षा अधिक तपोबल अर्जित केल्याने सूक्ष्म स्तरावर कार्तवीर्य सहस्रार्जुनाच्या पराभवाचा आरंभ होणे – हैहय वंशातील अधर्मी राजा महिष्मती नरेश कार्तवीर्य सहस्रार्जुनाने सहस्रो वर्षे कठोर तपश्चर्या करून भगवान दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले आणि असीम बलशाली बनून सहस्रो भुजा धारण करण्याचे वरदान प्राप्त केले होते. अशा कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा नाश करता यावा, यासाठी त्याच्या तपोबलापेक्षा अधिक तपोबल अर्जित करण्यासाठी परशुरामाने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली.कार्तविर्याचे तपोबल परास्त करण्यासाठी परशुरामाने त्याहून कठोर तपश्चर्या करून ब्राह्मतेजाच्या शस्त्राने कार्तविर्याच्या पुण्यबळावर एकप्रकारे प्रहार करून त्याला क्षीण केले. त्यामुळे कार्तविर्याच्या सहस्रावधी भुजांद्वारे कार्यरत असणार्या सूक्ष्म कर्मेंद्रियांची दिव्य शक्ती निष्प्रभ होऊ लागली आणि अधर्माचे प्रतीक असणाऱ्या कार्तविर्याच्या पराभवाचा सूक्ष्मातून आरंभ झाला. कार्तविर्याला पराभूत करण्यासाठी भगवान परशुरामाने दिलेला हा आध्यात्मिक स्तरावरील लढा अद्वितीय आहे.