वादळवारा;परभणीला अवकाळी पावसाने झोडपले
ठिक ठिकाणी झाडे उन्मळली;आंबा, फळबागसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान
परभणी/प्रतिनिधी:
शहरात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार सोसाट्याचा वारा वाहायला सुरुवात झाली. त्यातच जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात झाडे उन्मळण्याचे, विजेचे तार तुटण्याचे आणि अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने शेतातील काढणीस आलेल्या आंबा, फळबाग आणि भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडला आहेत.
काल सोमवार ता.५ में पासून जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटत आहे.हाच प्रकार मंगळवारी सायं पुन्हा एकदा घडला. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात या अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे मोठे नुकसान, हानी पोहोचली आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील वीज वितरण कंपनीद्वारे आधीच भारनियमन सुरू आहे. त्यात आता या वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी विजेचे तार, पडल्याने मागील २४ तासांपासून वीज गुल झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे.एकीकडे दिवसभर उकाडा त्यातच बत्तीगुल झाल्याने जीवाची पुरती तगमग होत आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे, शेतकऱ्यांनी आपली पिके व पशुधनाचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.