पूर्णा तालुक्यात १४ वाळू घाटांचे ई-लिलाव
पूर्णा तालुक्यात १४ वाळू घाटांचे ई-लिलाव;सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; वाळूच्या चढ्या भावापासुन होणार सुटका;चोरीलाही बसणार आळा
पूर्णा (प्रतिनिधी)
जिल्हा प्रशासनाने ८ एप्रिल २०२५ च्या वाळू धोरणानुसार, जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त तब्बल ५३ वाळू घाटांची ई-लिलाव प्रक्रिया हाती घेतली आहे.यामध्ये पूर्णा तालुक्यातील गोदावरी व पूर्णा नदीपात्रातील १४ ठिकाणच्या वाळू घाटांचा समावेश आहे.सर्वसामान्य नागरिकांना बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूच्या चढ्या भावांपासुन काही अंशी दिलासा मिळणार असून लवकरच कमी किंमतीत वाळू मिळणार आहे.तसेच मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळू चोरीलाही आळा बसणार आहे.
यंदाच्या वाळू धोरणानुसार,पर्यावरण अनुमती नुसार ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत यावर्षीचा व पुढील वर्षी १० जुन ते ३० सप्टेंबर पावसाचा हंगाम वगळता जिल्ह्यातील वाळू घाटांचा ई-लिलाव करण्यास संमती दिली आहे. त्यानुसार जिल्हा पालम,पूर्णा,गंगाखेड,सेलु, मानवत, जिंतूर,सोनपेठ तालुक्यातील एकूण ५३ वाळू घाटांचा समावेश करण्यात आला आहे.या घाटांपैकी पूर्णा तालुक्यातील गोदावरी काठच्या सातेगांव, देवठाणा, पिंपळगाव सारंगी, वझुर,मिठापूर, धनगर टाकळी, कंठेश्वर,खरबडा तर पूर्णा नदी काठच्या,निळा, कानडखेड, ममदापूर,सुकी, पिंपळगाव बाळापूर, संदलापूर या १४ गावांत ता.२४ एप्रिल पासून ते ३ में २०२५ पर्यंत लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यात संबंधित ठेकेदार,संस्थांना ई-लिलावात शासनाने ठरवून दिलेल्या शासकीय बोलीच्या रक्कमेपैकी २५ टक्के रक्कम भरुन बोली बोलावी लागणार आहे.वाळू घाट सुटलेल्या ठेकेदारास उर्वरीत रक्कम लीलाव प्रकिया पार पडल्यानंतर १५ दिवसांचे आत भरणा करावी लागणार असल्याचे समजते.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्याने बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे दर गगनाला भिडले होते.त्यातच बेसुमार वाळू चोरी होत होती.वाळू घाटाचे लिलाव झाल्यावर सर्व सामान्य नागरिकांची वाढलेल्या वाळू दरांपासून सुटका होणार आहे.मात्र वाळूच्या गोरखधंद्यात उखळ पांढरे करून घेणा-या महसूल व पोलीस विभागातील अनेकांचा भ्रम निरास होणार आहे.