शेतकऱ्यांच्या ३५ कोटींच्या अनुदानवर तलाठ्यांनीच मारला डल्ला
जालना(प्रतिनिधी)
अतिवृष्टी आणि अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. १० तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले. अनुदान वाटपात गैरव्यवहार झाल्या बाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या.या तक्रारीची दखल घेण्यात आली. त्यानंतर तलाठ्यांचे खुलासे घेण्यात आले यामध्ये ते दोषी आढळून आले. त्यानंतर त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे..
जालन्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपीटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून २६ अधिकाऱ्यांनी तब्बल ३५ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने १० तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली. जालना जिल्ह्यात २०२२ ते २०२४ मध्ये अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी केली असता अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावातील २६ ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी तब्बल ३५ कोटी हडपले असल्याचे उघडकीस आले. यातील १० तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले असून इतर तलाठ्यांचे खुलासे घेवून त्यानुसार अभिलेख तपासून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्यांची नावं देखील समोर आली आहे. गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल गाडेकर, बाळू सानप, पवन सुलाने, शिवाजी ढालके, कल्याण बमणावत, सुनील सोरमारे, प्रवीण शिनगारे, बी.आर भुसारे अशी निलंबित तलाठ्यांची नाव आहेत. या कारवाईमुळे जालना जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.