पूर्णा (ता.१)/प्रतिनिधी
मराठवाड्यातील प्रमुख जलाशयांपैकी सर्वात मोठ्या (Jaylkwadi Dam) मुंगी पैठण जायकवाडी( नाथसागर) प्रकल्पातुन (ता.३१) जुलै रोजी दुपारी ३ वाजता गोदावरी नदीपात्रात जवळपास ९ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, प्रशासनाने ,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.
मागील आठवडयात मराठवाडयासह जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामुळे नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार गुरूवारी दुपारी ३ वाजता जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात ९ हजार ४३२ क्युसेक्स इतक्या वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक लक्षात घेता आणि धरणाच्या जलप्रचलन आराखडयानूसान पाणी पातळीचे नियोजन करणे आवश्यक असल्याने जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जात आहे.जिल्हयातील गोदावरी नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील गाव आणि नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.