विधानसभा अधिवेशन;अंत्योदय योजनेचे उद्दीष्ट वाढवा-आ.डॉ.राहुल पाटील
परभणी ता.९(प्रतिनिधी)
अन्न व पुरवठा विभागाच्या अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांची उद्दिष्ट संख्या वाढवून अन्नधान्याचा लाभ द्या, अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी ता.९ रोज बुधवारी केली.
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार पाटील यांनी अन्नसुरक्षा योजनेतील वंचित लाभार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला. परभणी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेची ६० हजार आणि अंत्योदय योजनेचे पाच हजार लाभार्थ्यांना अजूनही योजनेचा लाभ मिळत नाही याबाबत तक्रार केली असता अन्न व पुरवठा विभागाने खोटी माहिती देत सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आमदार डॉ.पाटील यांनी केला.तहसीलदारांचे पत्र असतानाही पुरवठा विभागाकडून शिलकी इष्टांक दाखवत खोटी माहिती कशी दिली जाते असा प्रश्न सभागृहात करत पुरवठा विभागाला धारेवर धरले. सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात अन्नसुरक्षा योजनेसाठी लाभार्थी उद्दिष्ट दिले जाते हे चुकीचे आहे, पंधरा वर्षात वाढलेली लोकसंख्या आणि महागाई पाहता प्रत्येक तहसील कार्यालयांचे उद्दिष्टे वाढवून द्यावे, अशी मागणी केली. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याप्रमाणे राज्यात देखील हा कायदा करावा अशी मागणी केली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर ही अजूनही गोरगरीब नागरिकांना पुरेसे अन्न मिळत नसेल तर सरकार काय करते असा सवाल केला. प्रथम प्राधान्य योजनेचे आणि अंत्योदय योजनेतील उत्पन्न मर्यादा वाढवा, लाभार्थी उद्दिष्ट वाढवा अशी मागणी यावेळी केली.त्यावर अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिले. या सर्वांची तपासणी करून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊ त्यासोबतच उद्दिष्ट कशाप्रकारे वाढवता येईल आणि उत्पन्न मर्यादेबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.











