खा.संजय जाधवांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
परभणी(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील लाखो शेतकर्यांना पिकविमा मिळालेला नाही. त्यामुळे तात्काळ सरसगट पिकविमा शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.
विविध विकास कामांच्या उद्घाटनाकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि.29) परभणी दौर्यावर आले होते. यावेळी खासदार जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पिकविम्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देऊन शेतकर्यांच्या विदारक परिस्थितीची कल्पना दिली. परभणी जिल्ह्यात शेतकर्यांच्या पिक विम्याचा प्रश्न अतिशय जटील व गंभीर बनला आहे. विम्याची रक्कम देण्याबाबत विमा कंपनी टोलवाटोलवी व टाळाटाळ करत असून जिल्हा प्रशासन हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सन 2024-2025 मध्ये 4,69,533.40 हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र असून 7,20,459 शेतकर्यांनी पिक विमा काढलेला आहे. या वर्षात ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात जोरदार पाऊस पडल्याने शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, नुकसान भरपाईपोटी शासनाने सानुग्रह अनुदान देऊन शेतकर्यांना मदतही केली. त्यानंतर सरसकट शेतकर्यांना विमा देण्याचे निर्देशही शासनाने दिले. परंतु असे असतानाही विमा कंपनीने काही अनावश्यक अटी टाकल्याने शेतकरी विम्याच्या रकमेपासून अद्याप वंचित राहिले आहेत.पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्या बँकांवर कठोर कारवाई करून यापुढे शेतकर्यांना पीक कर्ज वेळेवर द्यावेत. शेतकर्यांना दर्जेदार बियाणे व पाहिजे तो खत वेळेवर उपलब्ध करून द्यावा.यासह परभणी शहरातील अंडर ग्राउंड ड्रेनेजसाठी मंजूर असलेला 450 कोटींचा निधी लवकरात लवकर देऊन हा प्रश्नन सोडवावा, आदी मागण्या खासदार जाधव यांनी या निवेदनातून केल्या आहेत.