रेल्वेकडून पुर्णेकरांची उपेक्षा ‘वंदेभारतला’ थांबाच नाही..!
जालना-मुंबई वंदेभारत एक्सप्रेस नांदेडहून चालवण्याची घोषणा; लोकप्रतिनिधींच्या भुमिकेकडे लक्ष
पूर्णा ता.१४(प्रतिनीधी)
दमरेच्या नांदेड विभागातुन मुंबई-जालना-मुंबई चालवण्यात येत असलेल्या ‘वंदेभारत’ एक्सप्रेसचा विस्तार नांदेड रेल्वे स्थानकापर्यंत करण्यास केंद्रीय रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दिला आहे.परंतु ब्रिटिश सरकारच्या काळापासून दमरेचे सर्वात मोठं जंक्शन असलेल्या ऐतिहासिक पुर्णा जंक्शनवर या गाडीला थांबा न दिल्याने पुर्णेकरांची मोठी उपेक्षा केली आहे. त्यामुळे पुर्णेकरांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.आता याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
एकेकाळी रेल्वेचे वैभव असलेल्या ऐतिहासिक पुर्णा रेल्वे जंक्शनला रेल्वेकडून मागील काही वर्षात भकास करायचं धोरण अवलंबिले आहे.येथिल रेल्वेचे विभागीय कार्यालय,लोकोशेडसह अनेक महत्त्वाची कार्यालय ईतरत्र हलवण्याची शृंखला तसेच सापत्यपणाची वागणुक आजपावेतो सुरू आहे.येथुन धावणा-या अनेक गाड्यांचा विस्तार करण्यात आला आहे.मात्र आता ईतर ठिकाणाहून विस्तार होत असलेल्या गाड्यांना पुर्णा रेल्वे जंक्शनवर थांबा दिला जात नाही.हे मात्र नवलच वाटते.रेल्वे प्रशासनाच्या या धोरणाविरोधात सातत्याने पुर्णेकरांनी आवाज उठवला आहे.त्यास लोकप्रतिनिधींचीही साथ लाभली आहे.तरीही निगरगट्ट प्रशासन हेतुपुरस्सर पणे आपली चाल खेळताना दिसत असल्याचे चित्र मुंबई-जालना-मुंबई ‘वंदेभारत एक्सप्रेस’च्या विस्तारानंतर दिसून येत आहे.वंदेभारत एक्सप्रेस रेल्वेचा नांदेड पर्यंत व विस्तार केल्याबद्दल केंद्रीय रेल्वे बोर्डाने १२ जुन रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले असुन गाडी क्र.२०७०५ नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे बुधवार वगळता दररोज सकाळी ५ ला नांदेड येथून निघून मुंबई सीएसटी येथे दुपारी २.२५ ला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी क्र. २०७०६ मुंबई सीएसटी येथून गुरुवार वगळता दररोज दुपारी १.१० ला रवाना होणार असुन,नांदेड येथे रात्री १०.५० ला पोहोचणार आहे.दरम्यान सदरील गाडी ही परभणी,जालना, छत्रपती संभाजीनगर, अंकाई, मनमाड,नाशिकरोड, कल्याण, ठाणे,दादर या रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याचे कळवले आहे. याप्रकारामुळे पुर्णेकरांत संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाने या गाडीला पुर्णेत थांबा द्यावा अशी मागणी होताना दिसत आहे.
लोकप्रतिनिधींच्या भुमिकेकडे लक्ष..
बहुचर्चित वंदेभारत एक्सप्रेस अपेक्षे प्रमाणे नांदेडहून धावणार आहे. मात्र पुर्णा स्थानकावर गाडीला थांबा न मिळाल्याने पुर्णेकरांची मोठी उपेक्षा झाली आहे. रेल्वेप्रशासनाच्या या भुमिकेविरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गाडीस पुर्णेतील थांबा मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.