परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

परभणीत भारतीय जनता पार्टीचा कृतज्ञता सोहळा

परभणी(प्रतिनिधी) :

विधानसभा निवडणूकीत परभणी जिल्हावासीयांनी महायुतीच्या पाठीशी भक्कम असे समर्थन उभे केले. जिल्हावासीयांच्या आशिर्वादाने हे सरकार आरुढ झाले आहे.मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळेच या जिल्हावासीयांचे हे प्रेम कदापिही विसरणार नाही,वर्षानूवर्षा पासून पूर्णतः दुर्लक्षित राहिलेल्या परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकरीता महायुतीचे सरकार कटिबध्द आहे. त्यामुळेच या जिल्ह्याचा, या जिल्ह्यातील सामान्य माणसात हे सरकार निश्‍चितपणे परिवर्तन घडवून आणेल, असा विश्‍वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

परभणी येथील स्टेडिअम मैदानावर भा.ज.पार्टीद्वारे गुरुवारी ता.२९ रोजी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, खासदार गोपछडे, मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, आमदार संजय केणीकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटींग, डॉ. विद्या चौधरी, विलास बाबर, माजी नगरसेविका मंगल मुदगलकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदी आरुढ होतेवेळीच आपणास वर्षानूवर्षापासून सर्वार्थाने दुर्लक्षित राहिलेल्या परभणी जिल्हा विषयीची खंत वाटप होती. कारण, या जिल्ह्याने दहा ते बारा वर्षे आयात केलेला पालकमंत्री अनुभवला. त्यामुळेच आपण या जिल्ह्यास स्वतःचा पालकमंत्री दिला पाहिजे, ही आपण खूनगाठ बांधली व सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या रुपाने या जिल्ह्यास मंत्रीमंडळात स्थान देवून, त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुध्दा बहाल केले. आता पालकमंत्र्यांच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभे राहणार आहे. या जिल्ह्याच्या, तसेच या जिल्ह्यातील सामान्य माणसात परिवर्तन घडावे यासाठी निश्‍चित प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

परभणी जिल्हावासीयांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जिव्हाळ्याचा विषय निश्‍चितपणे मार्गी लावला जाईल, आजच या महाविद्यालयाच्या इमारतीचे रितसर भूमीपूजन झाले आहे. त्यामुळे सुसज्ज अशी इमारत उभी राहणार आहे. भविष्यात अन्य पायाभूत सुविधासुध्दा उपलब्ध केल्या जातील, पालकमंत्री साकोरे यांनी कॅन्सर केअर सेंटर उभारणी संदर्भात केलेल्या मागणीचाही निश्‍चितपणे विचार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. सेलू येथील 132 केव्ही केंद्राचे भूमीपूजनही आजच झाले आहे. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या वीजेच्या संदर्भात समस्यांचे निराकरण होणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. नानाजी देशमुख कृषी समृध्दी योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राचा निश्‍चितच विकास होईल. दुसर्‍या टप्प्यातून या योजनेत यंत्र आणि तंत्रज्ञाचा पुरवठा, प्रशिक्षण, ड्रीपच्या योजना तसेच वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने त्यावर अनुदानेसुध्दा उपलब्ध होणार आहेत. एकात्मिक शेतीच्या या योजनेतून या जिल्ह्यात जलसंधारणाच्या योजनाही राबविल्या जातील, असे ते म्हणाले.

पालकमंत्री सौ. साकोरे यांनी व्यक्त केलेल्या अ‍ॅग्रो प्रोसेसिंगी कस्टरला सरकारद्वारे जागा उपलब्ध करुन दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. अ‍ॅग्रो प्रोसेसिंग क्ल्स्टरला पायाभूत सुविधासुध्दा उपलब्ध करुन देवू, असे ते म्हणाले. लोअर दुधना सिंचन प्रकल्पास पूरेसा निधी दिला आहे. आता समृध्दी महामार्गाच्या माध्यमातूनही परभणी नकाशावर येईल. तसेच महानगर असणार्‍या मुंबईशीही संपर्क वाढेल, असा विश्‍वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी पालकमंत्री सौ. साकोरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासंदर्भात काही मागण्या केल्या. त्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून दखल घेतली. या कार्यक्रमास गंगाधरराव बोर्डीकर, रामकिशन रौंदळे, डॉ. प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत डहाळे, अक्षय डहाळे, अरुण केंद्रे, राजेश देशमुख, भिमराव वायवळ, डॉ. राजेंद्र चौधरी, सौ. मेघनाताई फड, विलासमामा चांदवडकर, नागसेन पुंडगे, प्रशांत सांगळे, अद्वैत पार्डीकर, कमल अग्रवाल, संजय रिझवानी, अनुप शिरडकर, माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, ऋतुजा जोशी, अभिषेक वाकोडकर, दिनेश नरवाडकर, विश्वास कऱ्हाळे, मोहन कुलकर्णी, राजेश देशपांडे, सुरेश भुमरे, एस.एम. अली इनामदार, लक्ष्मीकांत क्षीरसागर, संजय कुलकर्णी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्टेडिअम मैदानावर उभारलेले भव्य मंडप खचाखच भरले होते. मंडपाबाहेर तसेच स्टेडियमच्या गॅलरीचा बहुतांशी भाग गर्दीने ओसंडून वाहत होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शहर व ग्रामीण शाखेद्वारे स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page