अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा : परभणीला १२८ कोटींचा मदतनिधी मंजूर
परभणी ता.१८(प्रतिनिधी)जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांसाठी १३६ कोटी ३ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.त्यापैकी परभणी जिल्ह्यातील तब्बल २,३८,५३० शेतकऱ्यांना मदतीसाठी १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. हा निधी डीबीटी पोर्टलव्दारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे.
महिन्यानिहाय तपशील :
- जून २०२५ – बाधित शेतकरी : १, क्षेत्र : ०.४० हेक्टर, मंजूर निधी : ९ हजार रुपये
- जुलै २०२५ – बाधित शेतकरी : ८७,११७, क्षेत्र : ६०,७३९.०२ हेक्टर, मंजूर निधी : ५१ कोटी ६४ लाख २२ हजार रुपये
- ऑगस्ट २०२५ – बाधित शेतकरी : १,५१,४१२, क्षेत्र : ९०,४८३.२० हेक्टर, मंजूर निधी : ७६ कोटी ९१ लाख ७ हजार रुपये
पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया
या संदर्भात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की,“परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे सुरू असून लवकरच त्यानुसारही शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.”