परभणीतुन मुंबईसाठी ‘वंदे भारत’ रेल्वे चालवा-खा.संजय जाधव
खा.संजय जाधवांची लोकसभेत मागणी
परभणी (प्रतिनिधी)
परभणी लोकसभा मतदारसंघातून मुंबईकडे धावणाऱ्या प्रवाशांसाठी सोईच्या रेल्वे गाड्या सिकंदराबाद,नागपूर पर्यंत लांबवण्यात आल्या आहेत त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातून मुंबईला जाण्यासाठी विशेष वंदेभारत रेल्वे चालवण्यात यावी अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी संसदीय अधीवेशनात बोलताना केली आहे.
दिल्लीत लोकसभेचे संसदीय अधिवेशन सुरू झाले आहे.परभणी जिल्ह्याचे लोकसभा खासदार संजय जाधव यांनी बुधवार ता.१९ रोजी सकाळच्या सत्रात रेल्वे समस्ये विषयक प्रश्न उपस्थित केला.यावेळी त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून राज्याची राजधानी मुंबईसाठी विशेष ‘वंदेभारत’ रेल्वे रेल्वे सुरू करण्याची मागणी केली.मतदार संघातुन मुंबई कडे देवगीरी व नंदिग्राम एक्सप्रेस चालवण्यात येतात परंतु मागील काही दिवसांपासून या दोन्ही गाड्यांचा विस्तार करुन गाड्या सिकंदराबाद,नागपूर,आदिलाबाद पर्यंत नेल्या आहेत.त्यामुळे परभणी जिल्ह्या तील प्रवाशांना समस्येचा सामना करावा लागतो.त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या लोकहिताचा निर्णय घेऊन विशेष ‘वंदेभारत’ रेल्वे चालवावी अशी मागणी खा.संजय जाधव यांनी केली आहे.