परभणी; १५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद..
परभणी; १५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद..
कोरोनाचा वाढता प्रभाव;जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश
परभणी /प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढत असलेला प्रभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी पुन्हा एकदा कोरोनाला रोखण्यासाठी कडक पावले उचलावयास सुरुवात केली असून १५ मार्च जिल्ह्यात सर्वत्र भरणारे आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश प्रशासनाला निर्गमित केले आहेत.
परभणी जिल्ह्यात आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले असून जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सर्वत्र कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून गर्दीची ठिकाणे,सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरताना नागरिक सुरक्षित सामाजिक अंतराचे पालन न करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, तोंडावर मास्क न लावता संचार करित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात करोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १५ मार्च २०२१ पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवावेत असे आदेश बजावले आहेत. महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आदींनी या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी त्यांच्यावर याबाबत जबाबदारी राहणार असल्याचेही आदेशात श्री. मुगळीकर यांनी म्हटले आहे.दरम्यान, या आदेशाचे पालन न करणार्याविरूध्द कारवाई करण्यात येईल, असाही इशारा जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी आदेशात दिला आहे.












