पीक विमा घोटाळाParbhani;परभणी जिल्ह्यात ११ हजार २२१ शेतकऱ्यांच्या नावे भरला बोगस पिकविमा
महसुली क्षेत्र नसतानाही लाटले ६५ कोटीं
परभणी(प्रतिनिधी):
जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, जिंतूर,पालम तालुक्यातील १७ गावांतील ११ हजार २२१ शेतकऱ्यांच्या नावे महसुली क्षेत्र नसतानाही पिक विमा भरण्यात आला असल्याचे उघडकीस आले असून परभणी जिल्ह्यात सुमारे ६५ कोटींच्या वर अपहार झाल्याचा दावा जिल्ह्राचे खासदार संजय जाधव यांनी सांगितले आहे.संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
परभणी येथे बिड जिल्ह्यातील भाजप नेते आ.सुरेश धस यांनी परभणी येथे आक्रोश मोर्चा दरम्यान तत्कालीन कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर बोगस पीक विमा भरण्यात आल्याचा आरोप धस यांनी केला होता. यानंतर खा.जाधव यांनी याबाबत खोलात जाऊन माहिती घेतली असता बोगस पीक विमा घोटाळ्यात परभणी जिल्ह्यातील १७ गावांचा समावेश असून जवळपास अंदाजे ६५ कोटींचा हा अपहार असल्याची धक्कादायक माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे.जिल्ह्यातील गंगाखेड, सोनपेठ, पालम, जिंतूर या चार तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील आनंदनगर, जिंतूर तालुक्यातील आंगलगाव तांडा, केहाळतांडा, लिंबला, पोखर्णी तांडा, सावळी नगर, तेलवाडी, पालम तालुक्यातील मोजमाबाद तांडा, रामपुरी तांडा, सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा, कोथाळा तांडा, मनसीराम तांडा, रेवातांडा, सखाराम तांडा, सोनपेठ शहर, सोनपेठ (एम.सी.आय) तुकाई तांडा, या परिसरातील जमीनी दाखवून हा विमा भरण्यात आला. २०२४ – २५ साली ११ हजार २२१ शेतकर्यांच्या नावावर २६ हजार १४९ क्षेत्रावर हा विमा भरण्यात आला आहे. हा विमा भरलेल्या गावात महसूल क्षेत्रच नसल्याची माहिती समोर आली आहे. मग हा विमा भरताना बोगस कागदपत्रे लावण्यात आल्याचे समोर आले आहे. हा विमा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील लोकांच्या नावाने सर्वाधिक भरण्यात आला आहे. हा एकाच वर्षाचा घोटाळा समोर आला असून हा आकडा अंदाजे ६५ कोटींच्या जवळ असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या बोगस पीक विम्याची व्याप्ती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे.
गुन्हा दाखल करुन तपास करावा,अशी मागणी खा. संजय जाधव यांनी केली.