मुख्यमंत्री फडवणीसांच्या हस्ते मंगळवारी ‘वंदेभारत’एक्सप्रेसला हिरवी झेंडी
नांदेड रेल्वे स्थानकावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार झेंडा दाखवून करणार रवाना
पुर्णा ता.२५(प्रतिनिधी); Nanded-Mumbai Vandebharat train newsराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी (ता.२६) ऑगस्ट रोजी नांदेड रेल्वे स्थानकावर एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘वंदेभारत’एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत.
बहुचर्चित जालना ते मुंबई ‘वंदेभारत’एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार झाल्याची घोषणा होऊन महीनाभराचा कालावधी लोटला आहे. मंगळवार (ता.२६)रोजी नांदेड ते मुंबई अशी उद्घाटन विशेष गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरुन सुटेल.येथिल रेल्वे विभागाच्या वतीने नांदेड स्थानका वर सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गाडीस हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत.यावेळी पालकमंत्री अतुल सावे,खा.अशोक चव्हाण,खा.डॉ.अजित गोपछडे आदींसह नांदेड रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गाडी संख्या २०७०५/०६नांदेड -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई .अत्याधुनिक सुविधांसह स्वदेशी बनावटीची ‘वंदेभारत’ एक्सप्रेसचा ट्रेन सेट रेल्वे वापरकर्त्यांना जलद, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास अनुभव देईल आणि “आत्मनिर्भर भारत” या दिशेने भारतीय रेल्वेच्या दृष्टिकोनातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल असेल. ही गाडी मराठवाडा प्रदेशातील नांदेडला राज्याची राजधानी म्हणजेच मुंबईसह छत्रपती संभाजी नगर, मनमाड, नाशिक, कल्याण, ठाणे आणि दादर यासारख्या राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांशी देखील जोडेल.
पर्यटनाला चालना मिळणार
प्रदेशातील तीर्थयात्रेच्या पर्यटनाला चालना मिळेल. नांदेड येथील विश्व प्रसिध्द सचखंड साहिब गुरुद्वारा, जालन्यातील राजूर गणपती मंदिर, तसेच छत्रपती संभाजी नगरजवळील भगवान शिवाचे घृणेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, अजिंठा आणि वेरूळ लेणी आणि मनमाडजवळील शिर्डी ही महत्त्वाची तीर्थस्थळे सेमी-हाय स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटीने जोडली जातील ज्यामुळे यात्रेकरूंना अधिक आराम आणि सुविधा मिळेल.
प्रवाशांच्या वेळेची बचत
नांदेड ते मुंबई दरम्यानचे ६१० किमी अंतर ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करेल. यात २० डबे (एक्झिक्युटिव्ह – ०२, चेअर कार – १८) असतील आणि एकूण १४४० आसन क्षमता असेल. ही गाडी नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) आणि इतर शहरांमधून दिवसा प्रवास करून मुंबई येथे दुपारी पोहोचण्याकरिता आणि मुंबई वरून संध्या/रात्री परत येण्यासाठी सोयीस्कर वेळापत्रक प्रदान करते. ही गाडी आठवड्यातून ६ दिवस (बुधवार वगळता नांदेडहून आणि गुरुवार वगळता मुंबईहून) धावणार आहे.
आधुनिक सुविधा असलेली गाडी
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक प्रवाशांसाठी सुविधा आहेत जसे की ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, आलिशान इंटीरियर, स्पर्शमुक्त सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक स्पर्श आधारित वाचन दिवे आणि लपविलेले रोलर ब्लाइंड्स, चांगले उष्णता वायुवीजन आणि जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी यूव्ही लॅम्पसह एअर कंडिशनिंग सिस्टम. प्रत्येक कोचमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टम आणि कवच तंत्रज्ञानासह सुरक्षा वैशिष्ट्ये ही एक अतिरिक्त वैशिष्ट्य आहे.












