ताडकळस कडकडीत बंद;व्यापा-यांचा पाठींबासोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट प्रकरण
ताडकळस(प्रतिनिधी) : सोशल मिडीयामधून वारंवार होणार्या औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या बाबतीत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ ताडकळसकरांनी गुरुवार २० मार्च रोजी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. या दरम्यान छोटे मोठी सर्व दुकाने दिवसभर बंद होती. व्यापार्यांनी या हा बंद उत्स्फूर्तपणे पाळला.
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील एका तरुणाने बुधवारी १९ रोजी रात्री औरंगजेबाच्या उद्दातीकरणाची पोस्ट समाज माध्यमातून व्हायरल केली होती.या पोस्ट वरुन ताडकळस येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याप्रकरणी पोलिस कर्मचारी नागनाथ पोते यांच्या फिर्यादीवरून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे,उपविभागीय अधिकारी चंद्रशेन देशमुख, पूर्णेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील आदींनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली .यानंतर सरपंच गजाननराव आंबोरे, बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार, माजी सभापती रंगनाथराव भोसले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुधा पाटील आंबोरे, माजी उपसरपंच सैजूभैय्या शेख, पत्रकार सुरेश मगरे,सामाजिक कार्यकर्ते फेरोज पठाण आदींनी गावात सामंजस्य रहावं, जातीय तेढ निर्माण होऊ नये या दृष्टीने प्रयत्न केले. कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रतिक्रिया नोंदवू नयेत, असे आवाहनही गावातील ज्येष्ठ नेतेमंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.दरम्यान घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले . दरम्यान गुरुवारी दिवसभर संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. पोलिस ठाण्यात देखील पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी व ताडकळस पोलिसांनी सुध्दा सोशल मिडीयातील फेक न्यूज, आक्षेपार्ह पोस्ट कोणीही व्हायरल करु नयेत, असे आवाहन केले. जो कोणी भावना दुखावणार्या पोस्ट करेल त्याच्या विरोधात कठोर पाऊले उचलली जातील, असा इशाराही प्रशासनाने दिला.