परभणीत संतप्त शेतकर्याने जिल्हाधिकार्यांची गाडी फोडली
परभणी,ता.२८/प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पिक नुकसानीची मदत न मिळाल्याने, महायुती सरकारने शेतकरी विरोधी धोरण अंगिकारल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्याने जिल्हाधिकार्यांची गाडी फोडल्याची घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी घडली.संतोष रावण पैके रा. चाटोरी ता. पालम असे संतप्त शेतकर्याचे नाव आहे. परभणी जिल्हयात सर्वदूर अनेकवेळा अतिवृष्टी झाल्याने आणि पुराचे पाणी शेतात शिरल्याने लाखो हेक्टर जमीनीवरील पिके वाहुन गेली. शासनाने जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी न मिळाल्याने शेतकर्यांनी काळी दिवाळी साजरी केली. तसेच महायुती सरकारने शेतकरी विरोधी धोरण अंगिकारल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संतोष पैके यांच्या संतापाचा उद्रेक झाला. घटनास्थळावरून शेतकरी संतोष पैके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.












