श्री.वैजनाथांच्या पावनभुमीत गुरु महिमेचा गजर.!
दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या गुरूपोर्णिमा उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी
परळी वैजनाथ ता.१३(प्रतिनिधी)
दिव्य ज्योति जागृती संस्थान लातूर शाखेच्या वतीने प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हालगे गार्डन परळी वैजनाथ येथे गुरूपोर्णिमा महोत्सव अत्यंत भव्य, दिव्य व भक्तिमय वातावरणात मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थित राहुन गुरूचरित्राचा महिमा अनुभवला.
कार्यक्रमाची सुरूवात परळी शहरातील मान्यवरांच्या हस्ते पवित्र दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर श्री गुरूंची आरती, भजने व भक्तीमय वातावरणात संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. यानंतर प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्या दिल्ली येथील सुप्रसिद्ध भागवत भास्कर कथा व्यास सुश्री पद्महस्ता भारतीजी यांनी आपल्या सुमधूर वाणीतील प्रवचनातून गुरूंचे जीवनातील स्थान, त्यांची शास्त्रोक्त महती, अध्यात्मिक मार्गदर्शनाचे महत्व यावर सखोल विचार मांडले. त्यांनी वेद-उपनिषदे तसेच विविध संतांच्या उदाहरणांच्या माध्यमातून गुरू हा एकमेव असा दीपस्तंभ आहे, ज्यो अज्ञानातून ज्ञानाकडे वाट दाखवतो, असे ठामपणे सांगितले. यावेळी अनेक भाविकांना त्यांच्या प्रवचनातून नवचैतन्य व सकारात्मक प्रेरणा मिळाल्याचे जाणवले. परळी येथील हालगे गार्डन येथे आज रविवार दि.१३ जुलै रोजी दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने आयोजित गुरू पोर्णिमा उत्सव २०२५ प्रसंगी प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्या सुश्री पद्महस्ता भारतीजी बोलत होत्या. कार्यक्रमस्थळ भक्तांनी आकर्षकरित्या सजविल्याने आनंदी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. परिसरात रांगोळी काढून आणि सुशोभिकरण केल्याने वातावरण प्रसन्न दिसत होते. प्रवेशद्वारालाच प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांचे आकर्षक स्वरूप एका सुंदर मंदिरात दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. या मंदिरापुढेही आकर्षकरित्या काढलेली रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. सत्संग परिसरात विविध साहित्याचे स्टॉल लावले होते.या कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरूचरणी विविध भजने सादर करण्यात आली. टाळ तसेच संगीताच्या स्वरध्वनीवर गुरू पोर्णिमा उत्सव व सभागृह अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली. व्यासपीठावर सुश्री लक्ष्मी भारतीजी, सुश्री धनश्री भारतीजी आदी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित साधक व भक्त टाळ्यांच्या गजरामध्ये भजनात सहभागी झाले होते. परळीसह अंबाजोगाई, सोनपेठ, गंगाखेड, नांदेड, सिरसाळा,माजलगाव, कळंब, केज, लातूर आदी ठिकाणाहून भाविकांची अलोट गर्दी या सत्संग सोहळयास लाभली होती. गुरूपोर्णिमेच्या या कार्यक्रमामुळे परळी शहरात धार्मिकतेचे भरगच्च वातावरण दिसून येत होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिव्य ज्योति जागृती संस्थानच्या परळी शाखेच्या सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमातून उपस्थित भाविकांनी अध्यात्मिक समाधान व गुरूसेवेचा प्रसाद घेवून आनंद व्यक्त केला.
सदगुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते – सुश्री पद्महस्ता. सुश्री पद्महस्ता भारतीजीनी गुरू कोण असावा ? यापासून शिष्यापर्यंतची संपूर्ण व्याख्या अतिशय सहजतेने व विविध उदाहरणासह स्पष्ट केले. ते म्हणाले की, गुरू सेवा ही सर्वश्रेष्ठ असून ही सेवा श्री हनुमंतासारखी पारदर्शक असावी. श्रीराम व हनुमान यांचे संदर्भ उदाहरण देवून सुश्री पद्महस्ता भारतीजी पुढे म्हणाल्या की, गुरू हा बुद्धीचा राजा असून गुरू व शिष्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जीवन जगत असतांना आपणास अनेक अडचणी येत असतात. परंतू या अडचणीतूनही सदाचाराचा मार्ग दाखविण्याचे काम आपले गुरू नकळतपणे करीत असतात त्याकरीता गुरूवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक असून अनेकदा गुरू शिष्याची परिक्षा घेतो तेंव्हा शिष्याने त्या प्रसंगाला तन्मयतेने तोंड दिले पाहिजे असे सुश्री पद्महस्ता भारतीजी म्हणाल्या.
भारतीजीगुरूच योग्य मार्ग दाखवून कल्याणाचा महामंत्र देतो -सुश्री अन्नपूर्णा भारतीजी. पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्या सुश्री अन्नपूर्णा भारतीजी यांनी सांगितले की, सध्याचे जीवन अत्यंत खडतर असून स्पर्धेच्या युगात मानव नाहकपणे भरकटत आहे. अशावेळी गुरू त्यांना योग्य मार्ग दाखवून कल्याणाचा महामंत्र देतो असे त्या म्हणाल्या. दरम्यान सर्वश्री आशुतोषजी महाराज हे आम्हा सर्वांचे गुरू असून त्यांनी दिलेली शिकवण आमच्या जीवनाचे सार्थक करण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास सुश्री अन्नपूर्णा भारतीजी यांनी व्यक्त केला.












