शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व माणूस घडविण्याचे माध्यम आहे- डॉ.दिलीप शृंगारपुतळे
पूर्णा(प्रतिनिधी)
शिक्षणाने माणसाचे जीवन सुसंस्कृत आणि सुंदर बनते,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व माणूस घडविण्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तथा शिक्षक डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी केले.
पूर्णा तालुक्यातील मौजे कंठेश्वर येथे ता.२६ रोजी येथिल स्वा.सै.सु.पवार महाविद्यालयाच्या वतीने स्थानिकांसाठी लाभदायक उपक्रमांतर्गत आयोजित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व या व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भारती, मंचावर पत्रकार जगदीश जोगदंड, मारोती शेरकर, दत्तरावजी कदम, संजय कदम, नरहरी कदम, पांडुरंग कदम, सरपंच हरिभाऊ कदम ,ज्ञानेश्वर कदम आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.दिलीप शृंगारपुतळे पुढे म्हणाले की, शिक्षणाने माणूस घडतो व माणसां माणसांनी समाज घडतो.माणसां माणसांतील दरी मिट विण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात भरपूर काम करण्याची गरज आहे .प्रत्येक घरामध्ये ग्रंथ असले पाहिजे व सर्वांनी सायंकाळी दोन तास एका ग्रंथांचे सामूहिक वाचन केले पाहिजे. सर्वांनी शाळेतील मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या शिक्षणा कडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. गावातील शाळा, ग्रंथालय इत्यादी सगळ्या सुविधा लोकसहभागातून जपल्या गेल्या पाहिजेत यासाठी सर्व ग्रामस्थांनी आवश्यक ते सहकार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला भारतीय सेनेमध्ये निवड झालेले पांडुरंग कदम ,शिक्षक म्हणून निवड झालेले ज्ञानेश्वर कदम तर गावचे पोलीस पाटील म्हणून ज्यांची निवड झाली असे गजानन कदम यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संतोष कु-हे,सूत्रसंचालन नितीन कदम यांनी तर आभार पांडुरंग कदम यांनी मानले .या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.