खत टंचाईत शेक-यांच्यासाठी खा.संजय जाधव धावले;’डीएपी’ खत वाटप सुरु
परभणी ता.१२ (प्रतिनिधी)
ऐन खरीप पेरणी हंगामात खत टंचाई निर्माण झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी परभणीचे खा. संजय जाधव धाऊन आल्यांने प्रशासनाने दखल घेत शुक्रवार ता.१३ जून २०२५ पासून डीएपी, युरिया हे खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत पलब्ध राहणार आहेत.
खत कंपन्या व दुकानदार यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामात डीएपी हा खत मिळण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यातच मागील आठवड्यात तर शेतकऱ्यांना डीएपी हा खत मिळतच नव्हता. हा खत मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. विशेष म्हणजे कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत होते. ही बाब परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ कृषी विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना डीएपी व इतर आवश्यक रासायनिक खतांचा पुरवठा करावा, जेणेकरून खाजगी सावकार व दुकानदार यांच्याकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले.
तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लक्ष घालण्याच्या सूचना खा. जाधव यांनी दिल्या होत्या. त्यावरून परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले पाटील, संचालक रावसाहेब रेंगे, सुक्रे वडगावचे सरपंच परमेश्वर सुक्रे व अन्य शेतकऱ्यांनी आज दि. १२ जून रोजी कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व शेतकऱ्यांना तात्काळ डीएपी सह इतर आवश्यक रासायनिक खते उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
जिल्हाधिकारी रमेश गावडे यांनी या मागणीची त्वरीत दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण व जिल्हा मार्केटिंग अधिकारी कुंडलिक शेवाळे यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्याशी खत पुरवठ्याबाबत चर्चा केली. तेव्हा या अधिकाऱ्यांनी बफर स्टॉकमधील ४०० टन डीएपी व २ हजार टन युरिया खत उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यावर सदर खत तात्काळ शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी या अधिकाऱ्यांना दिले.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता उद्या म्हणजे शुक्रवारपासून डीएपी व युरिया हे खत उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.