जांभुळ बेट संवर्धन समीतीने स्वखर्चाने तोडल्या रस्त्यावरील काटेबाभळी

Spread the love

संबंधित बांधकाम विभाग झोपेत;लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

पूर्णा/पालम(प्रतिनिधी)ता.२६ डिसेंबर
गोदामाईच्या सानिध्यात वसलेलं जांभुळ बेटं पहाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाट लई खडतर झाली आहे.७ किमी अंतराच्या पालम-जांभुळबेट रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून खड्डेमय रस्त्यावर वाट काढताना रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेबाभळींचा मोठा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो आहे.स्थानिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली असून, ईथे येणाऱ्या पर्यटकांनी केलेल्या सुचनेवरुन जांभुळ बेटाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या समितीनेच पुढाकार घेत वर्गणी गोळा करून वाढलेल्या काटेबाभळी तोडल्या आहेत.
       पूर्णा-पालम तालुक्याच्या मधोमध वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या मधोमध एक निसर्गरम्य जांभुळ बेटं आहे.शासनाकडून या बेटांचे संवर्धन होत नसल्याने जिल्हयाचे कृषीभूषण कांतरावकाका झरीकर यांनी बेटाच्या संवर्धनासाठी लोकसभागातून एक चळवळ उभारली आहे. बेटाला येणाऱ्या रस्त्यापासून ते बेटावरील सर्व बाबींवर संवर्धन समीतीच्या माध्यमातून काम सुरू केले आहे.संवर्धन समीतीच्या वतीने पालमकडून बेटाकडे  येणाऱ्या ७ किमी रस्त्याचे मजबुतीकरण,डांबरीकरण करावे अशी मागणी लावून धरली आहे.मात्र संबंधित मागणीकडे स्थानिक बांधकाम विभागाने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी,पर्यटन विकास विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.बेटं पहाण्यासाठी दैनंदिन शेकडो पर्यटक इथे येतात.मात्र पर्यटकांना बेटाकडे येण्यासाठी रस्त्यावरील खड्डे व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेबाभळींतुन मार्ग काढत म तारेवरची कसरत करावी लागत आहे.याबाबत काही पर्यटकांनी  जांभूळ बेट येथील रजिस्टर मध्ये याबाबत सूचना केल्या होत्या. जांभूळ बेट संवर्धन समितीचे अध्यक्ष कृषिभूषण कांतरावकाका व सदस्य अर्जुन गुरुजी गोळेगावकर,संदीप गोळेगावकर, गोविंदराव दुधाटे,राम कदम काटेरीबाभळी तोडण्यासाठी पुढाकार घेत वर्गणी गोळा करून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली बाभळी जेसीबीच्या साह्याने तोडून रस्त्याची वाट मोकळी करून दिली आहे.
     निसर्गाचे संवर्धन करणारे निसर्गप्रेमी पर्यटकांची होत असलेली परवड रोखण्यायासाठी पुढाकार घेत आहेत. संबंधित निर्लज्ज बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.जिल्हातील लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी निसर्ग प्रेमी जनतेतुन होत आहे.

You cannot copy content of this page