दिड वर्षांपासून बंद शिव रस्त्याची वाट कधी मोकळी होणार
पूर्णेचे महसूल प्रशासन दाद देईना; कंठेश्वरचे शेतकरी मेटाकुटीला
पूर्णा(प्रतिनिधी)
शिव रस्त्यावर अतीक्रमण केल्याने शेत रस्ता बंद झाला आहे.वाहीवाटीची वाट मोकळी करून देण्यासाठी पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथिल शेतकरी महसूल प्रशासनाला मागील दिड ते दोन वर्षांपासून अर्ज फाटे करत आहेत मात्र येथिल प्रशासन त्या शेतक-यांना दाद न देता त्यांना केराची टोपली दाखवत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.रस्ता मोकळा करण्यासाठी आता जावे तरी कुणाच्या दारात असा प्रश्न त्यांना पडला आहे.
पूर्णा तालुक्यातील मौजे कंठेश्वर येथिल गट नंबर १८० पासुन शासकीय शिव रस्ता जातो मात्र मागील काही वर्षांपासून परिसरात शेतकऱ्यांनी हा वहीवाटीचा शेत रस्ता अतिक्रमीत करुन रस्ताच गायब केला आहे. त्यामुळे या रस्त्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे वांदे झाले आहेत.येथिल पांडुरंग कदम ,भगवान कदम, पंडीत कदम, कुंडलीक कदम, ज्ञानोबा कदम आदींनी पूर्णा तहसीलदार यांना मागील २४ जुलै २०२३ पासुन तक्रार अर्ज दाखल केले आहेत.यानंतर प्रशासनाला त्यांनी पुन्हा १४ फेब्रुवारी २०२४ रोजी अर्ज दिला त्या नंतर स्थानिक महसूल प्रशासनाच्या वतीने जमावबंदी विभागाने एक नोटीस शेतकऱ्यांना बजावली मात्र शेत रस्ता काही खुला करुन दिला नाही.वारंवार विनवण्या अर्ज फाटे करुनही प्रशासन शेतकऱ्यांना दाद देत नसल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.तालुक्यातील अनेक गावांत ही समस्या निर्माण झाली आहे.अनेक ठिकाणी रस्त्यावरून वाद विकोपाला जाऊन कोर्ट कचेरी पर्यंत प्रकरणं दाखल होत आहेत.रस्ताच्या प्रश्न जर स्थानिक प्रशासन सोडविणार नसेल तर शेतकऱ्यांनी दाद मागण्यासाठी जावे तरी कोणाकडे असा सवाल शेतकरी वर्गातुन उपस्थित केला जात आहे
पूर्णा तालूक्यात कंठेश्वर ,माटेगांव,पांगरा,गौर,ताडकळस, कात्नेश्वर ,सह गत अनेक दिवसांपासून शेत रस्त्यासाठी अनेक शेतकरी परेशान आहेत.त्याकडे महसूल प्रशासनाने तात्काळ लक्ष देवून सदर रस्ते तात्काळ मोकळे करुन देणे गरजेचे आहे.शेतरस्ते त्वरित मोकळे करुन द्या अन्यथा रस्ता पोलिस बंदोबस्तात अतिक्रमित रस्ते खुले करा,शेत रस्ता कामात अडथळा आणणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा,असे आदेश महसूल मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सबंधीत प्रशासनास देवुनही अजून प्रशासन सदर आदेशाची अंमलबजावणी करावी त्या पध्दतीने करत निसून जाणिवपूर्वक दिरंगाई केली जात आहे.शिवाय,पूर्वापार चालू वहिवाट रस्त्याच्या जागेत कुठे नाली खोदून तर कुठे ती अतिक्रमित करुन शिवरस्ता,नंबरधुरा पाऊलवाटा,जुने शेत रस्ते दादागिरी करुन तुमचा रस्ता येथून नाही?म्हणत आडमुठी करुन खोडासाळपणे रस्ते बंद करण्यात आलेत.या सबंधी स्थानिक प्रशासनाकडे अर्ज करुनही ते याकडे गांभीर्याने घेत नाहीत.त्यामुळे महसूल विभागाच्या वरीष्ठांनी यात लक्ष घालावे.
-आनंद ढोणे पाटील
शेतकरी पांगरा लासीना