‘स्वाधार योजना’ तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही घेता येणार लाभ;सहा. आयुक्त-गीता गुट्टे
१५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत
पुर्णा:(प्रतिनिधी)
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. सदर योजनेचा लाभ यापूर्वी केवळ जिल्हास्तरावर प्रवेशित विद्यार्थ्यांनाच मिळत होता. आता योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, तालुकास्तरावर अकरावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार असून, वर्षाला ३८ हजार रुपये मिळतील. मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील इयत्ता अकरावी, बारावी, त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम थेट बँकेत खात्यात जमा करण्याकरिता शासनाने २०१७ पासून स्वाधार योजना सुरू केली आहे. त्यासाठी वेगवेगळे निकष ठरविण्यात आले होते. तथापि, शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून २६ डिसेंबर रोजी सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे.सादर योजनेसाठी अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
शैक्षणिक वर्षे २०२४-२५ साठी स्वाधार योजनेसाठीhttp://hmas.mahait.org या पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह पोर्टलवर भरलेला अर्ज त्या तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या शासकीय मुलां-मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याकडे विद्याथ्यर्थ्यांनी अर्ज संपूर्ण कागदपत्रासह सादर करावा असे आवाहन गीता गुट्टे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणी यांनी केली आहे.