‘लाखमोला ‘चे विशाल कदम’जय महाराष्ट्र ‘च्या तयारीत!.
विश्वसनीय सूत्रांची माहिती;चर्चा,संभ्रम अन् फोनाफोनीला वेग.
पूर्णा(प्रतिनिधी)
सुमारे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या उभ्या फुटीत अभंग राहिलेल्या परभणी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या भक्कम गडाला जोरदार हादरा बसण्याची चिन्हे असून या पक्षाचे गंगाखेड मतदार संघात सुमारे एक लाख 20 हजार मते मिळवून प्रतिस्पर्ध्याला घाम फोडणारे विशाल कदम ठाकरेंना जय महाराष्ट्र करीत धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.परिणामी पूर्णा शहरासह मतदारसंघात त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
मागील तीन वर्षांपूर्वी राज्यात मोठे सत्तांतरनाचे नाट्य घडले.त्यात ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांच्या रा.काँ.पक्षाला मोठे भगदाड पडले.राज्यात सत्तेची नवी समीकरणे जुळली.एकीकडून महायुत्ती तर दुसरीकडून मविआ लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले.लोकसभा निवडणुकीत महायुत्ती तर विधानसभा निवडणुकीत मविआने सपाटून मार खाल्ला.दरम्यान राज्यभरात पक्षांतरनाचे वारे वाहीले.त्यास परभणी जिल्हा मात्र अपवाद ठरला.आता राज्यात नव्याने महायुतीचे सरकार विराजमान झाले आहे.आपल्या पक्षाच्या पदरात पराभव पडल्याने जिल्ह्यातील काही नेत्यांसह कार्यकर्तेही सैरभैर झाले असल्याचे दिसून येत आहे. निष्ठावंत म्हणून ज्यांनी आजपर्यंत डंके की चोट पे राजकारण केले त्यांच्याकडूनच आता पक्ष बदलाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.गंगाखेड विधानसभा मतदारसंघात दोन वेळा ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नशीब अजमावणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम हे देखील उबाठा गटाला जयमहाराष्ट्र करुन शिंदे सेनेची कास धरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यासह पूर्णा तालूक्यात ऐकावयास मिळत आहे.येत्या काळात जर कदमांनी पक्षांतरण केलेच तर गंगाखेड मतदारसंघाचे भविष्यातील राजकारण निश्चितच वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पूर्णा येथील उबाठा गटाचे तरुण तडफदार विद्यमान जिल्हाप्रमुख विशाल कदम यांची जिल्ह्यात निष्ठावान म्हणून ओळख आहे.मागील २० ते २२ वर्षापूर्वी शिवसेनेकडून पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद, परभणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,न प चे नगरसेवक, उपनगराध्यक्ष ते नगराध्यक्ष पद तसेच मागच्या सात वर्षांपासून परभणीचे जिल्हाप्रमुख पद भुषवले आहे.शिवसेनेकडून त्यांना २०१९ व २०२४ विधानसभेच्या निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली होती.पहिल्या निवडणुकीत सुमारे पाऊन लाख तर दुस-या निवडणुकीत सव्वा लाखांच्या जवळपास विक्रमी मते मिळवली.मात्र दुर्दैवाने त्यांना या दोन्ही निवडणुकीत विजयश्री खेचून आणता आली नाही. मागील तीन महिन्यांपासून भविष्यातील राजकारणाचा विचार करून ते पक्ष बदल करणार असल्याची कुजबुज कानी पडत होती.बहुदा दोन वेळा निवडणूकीतील पराभव.उबाठा गटाचे निवडणुकीत झालेले पतन त्यातच आता पाच वर्ष विरोधी पक्षात राहून लाखो मतदारांसह कार्यकर्त्यांचा मेळा सांभाळण्याची वाट आगामी काळात खडतर दिसत असल्याची चुणूक त्यांच्यासह कार्यकर्त्यांना लागली असावी.त्यामुळेच की काय त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे कार्यकर्ते अलीकडे समाजमाध्यमावर खुलेआम व्यक्त होताना दिसत आहेत.मागील
पंधरा दिवसात गंगाखेड मतदारसंघासह जिल्ह्यात त्यांच्या पक्षबदलाची वावटळ जोरदार उठली आहे.ते खरच कधी आणि केव्हा भुमिका घेणार आहेत याकडे पूर्णा तालूक्यासह सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पक्षांतरणाचे परिणाम दिसणार का?
उबाठा गटाचे विशाल कदमांनी जर शिंदे सेनेत पक्षांतरन केले तर महायुत्ती मित्र पक्षाच्या ताब्यात असलेल्या गंगाखेड मतदारसंघात जिल्ह्यातील पाथरी मतदार संघात पक्ष प्रवेशावरुन नुकत्याच घडलेल्या नाराजी नाट्याप्रमाणे येथेही असेच काहींसे घडणार असल्याचे बोलले जात आहे.आगामी काळात देखील या पक्षांतरनाचे विधानसभेसह अन्य निवडणुकीत परिणाम पहावयास मिळणार आहेत.
बदलाचे स्पष्ट संकेत अन फेसबुक पोस्ट…
समाज माध्यमांवर पोस्ट करताना विशाल कदम, यांच्या बॅनरवर मा.नगराध्यक्ष,नगर परिषद,पूर्णा जिल्हाप्रमुख,परभणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अशी नोंद करून बाजूला मशाल हे चिन्ह असायचे, आज दि.२३ जानेवारी रोजी हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी अभिवादन करताना पोस्टमधून नेहमीचा फाॅरमट केवळ मा. नगराध्यक्ष याच पदाचा उल्लेख आहे,ही बाब पूर्णतः बोलकी असून सूत्रांनी दिलेल्या माहितीला खरी ठरवणारी दिसते.