रमाईंच्या नावाचा जागर होणे गरजेचे – डॉ. करुणा जमदाडे
पूर्णा / प्रतिनिधी
रमाई आंबेडकर ह्या एक संवेदनशील, त्यागी, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या मुला-बाळाची पर्वा न करता समाजातील लेकरांसाठी झिजल्या, बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या, पती शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्यामुळे रमाईच्या नावाचा जागर होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. करुणा जमदाडे यांनी केले.
पूर्णा शहरातील बुद्ध विहारात रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्ताने एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. करुणा जमदाडे बोलत होत्या. डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक, बुद्ध विहार समिती व धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि.७) बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी सकाळी १० वाजता अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरोयांच्या मार्गदर्शनाखाली भदंत पयावंश यांच्या संयोजनाखाली रमाई जन्मोत्सव व एकदिवसीय विपश्यना शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख धम्मदेशना भदंत अशिन उत्तम तारा सयाडो, संस्थापक अध्यक्ष थब रवा, मेडिटेशन सेंटर म्यानमार यांची झाली.जयंती उत्सवाच्या अध्यक्ष म्हणून निरंजना धम्म सेवाभावी महिला मंडळाच्या अध्यक्षा कासाबाई कांबळे होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून सुप्रसिद्ध लेखिका डॉ. करुणा जमधाडे व प्रमुख अतिथी भीमराव वायवळ होते.
याप्रसंगी रमाई कादंबरीचे लेखिका डॉ. करुणा जमदाडे रमाई आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांच्या रमाई कादंबरीच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. प्रमुख धम्मदेशनेमध्ये डॉ. अश्विन उत्तम तारा सयाडो यांनी विपश्यनेचे महत्त्व विशद केले. प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, अॅड. हर्षवर्धन गायकवाड, यादवराव भवरे, अमृत मोरे, टी. झेड. कांबळे, कॉ. अशोक कांबळे, वा.रा.काळे, इंजि.पी.जी रणवीर, दिलीप गायकवाड, विजय बगाटे, श्रीकांत हिवाळे,शिवाजी थोरात, हनवते, शामराव जोगदंड, गौतम कांबळे, मुगाजी खंदारे, ज्ञानोबा जोंधळे, गंगाधर बरबडीकर,अमृत क-हाळे, गौतम वाघमारे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बौद्ध विहार समीतीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.