सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात फौजदारासह चार पोलीस निलंबित

Spread the love

परभणी(प्रतिनिधी)
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार अशा चौघांना जिल्हा पोलिस यंत्रणेने सेवेतून निलंबित केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भारतीय संविधान प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणात आंबेडकरी चळवळीच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या दरम्यान शहर पोलिस यंत्रणेने दगडफेक प्रकरणात काहींना ताब्यात घेतले होते. त्यात सोमनाथ सुर्यवंशी यांचा समावेश होता. न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशानंतर सूर्यवंशी यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. परंतु, त्या कोठडीत सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. तसेच आंबेडकरी चळवळीचे अग्रगण्य नेते विजय वाकोडे यांचाही र्‍हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. अतिताणामुळे त्यांचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर त्याचे साद-पडसाद सर्वदूर उमटले. पिडितांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा यासाठी परभणीत दीर्घकाळ धरणे आंदोलन करण्यात आले. न्यायासाठी परभणी ते मुंबई असा लाँगमार्च काढण्यात आला. या दरम्यानच गृह खात्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात नवा मोंढा पोलीस ठाण्यातील फौजदार कार्तिकेश्‍वर तुरनर, पोलीस अंंमलदार सतीश दैठणकर, मोहित पठाण व राजेश जटाळ यांंच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याआधी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनाही तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.

You cannot copy content of this page