१२ वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात भरारी पथक बैठे पथकाची राहणार करडी नजर
परिक्षेसाठी सहा केंद्र, १ हजार ८७६ विद्यार्थी;पूर्णेत शिक्षण विभागाचे नियोजन
पूर्णा(प्रतिनिधी)
किशोर वयातून प्रौढवयाच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटली देणाऱ्या १२वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे पूर्णा तालुक्यातील शिक्षण विभागाने त्यासाठी अचूक नियोजन केले असून तालुक्यात सहा परीक्षा केंद्रांवर तब्बल १ हजार ८७६ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांसह बैठे पथकाची करडी नजर असणार आहे पोलिसांकडूनही परीक्षा केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पूर्णा तालुक्यात मंगळवार ता.११ फेब्रुवारी पासून १२ वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेला तालुक्यात एकूण १ हजार ८७६ विद्यार्थी बसले असल्याची माहिती शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी बालाजी कापसिकर यांनी दिली आहे. परीक्षेकरता शहरातील श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय ,संस्कृती महाविद्यालय ,इंदिरा गांधी महाविद्यालय तसेच तालुक्यातील जय जवान जय किसान महाविद्यालय कावलगाव, हायटेक महाविद्यालय झिरो फाटा, जय किसान विद्यालय लिमला या सहा परीक्षा केंद्रांची शिक्षण विभागाने निवड केली आहे. या परीक्षा केंद्रांवर महसूल विभाग, गटविकास अधिकारी, शिक्षण विभाग यांचे संयुक्त भरारी तसेच चार सदस्यांचे बैठे पथकही नियुक्त केले आहे. त्यात एक मुख्य पर्यवेक्षक आणि तीन सहाय्यक यांचा समावेश आहे. परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये , परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाच्या मदतीला पोलिसांची कुमकही तैनात करण्यात आली आहे.
शहरासह तालुक्यात एकूण २५ पोलीस जवान तसेच होमगार्ड तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.शिक्षण विभागाने नुकतेच जहीर केलेल्या निर्णयानुसार पार पडत असल्याचे चित्र आहे. पुढील दहा ते पंधरा दिवस चालणाऱ्या परीक्षेसाठी येथील शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी बालाजी कापशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभाग प्रमुख उमाकांत माने संदेश भरणे ज्ञानेश्वर टेकले कैलास शिंदे प्रकाश जाधव प्रशांत सोनवणे व्यंकटरमन जाधव आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.