शासकीय योजनेच्या कामात अडवणूक करणा-याची तक्रार करा-पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे नागरिकांना आवाहन
परभणी/प्रतिनिधी
घरकुल, विहिरी किंवा वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी एक रूपयादेखील देण्याची गरज नसून अशाप्रकारे कुणी पैशांची मागणी करून लाभार्थ्यांची अडवणूक करत असेल तर तक्रार घेऊन माझ्याकडे या, असे आवाहन राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शनिवारी (दि.1)पत्रकार परिषदेत केले.
याप्रसंगी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, सुरेश भुमरे, बाळासाहेब जाधव, विलास बाबर, प्रभाकर वाघीकर, सुनील देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2025-26 वर्षासाठीचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प सादर केला आहे. एकूण 50 लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये मध्यमवर्ग, शेतकरी, युवा, वंचित घटक, गरीब कल्याण आणि महिलांचा समावेश करून समाजाच्या सर्व स्तरांचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे राज्यमंंत्री ब बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.
त्या म्हणाल्या, या बजेटद्वारे 2024 ते 2047 पर्यंत भारताच्या सर्वांगीण विकासाचे भक्कम पाऊल टाकले आहे. ग्रामीण भाग, महिला, युवक, मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेसाठी भरीव तरतूदीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत दृष्टिकोनाला गती देणारा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
या बजेटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने आगेकूच करेल असेही श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात शेतकरी आणि कृषी विकासासाठी भरीव तरतूद, महिला व बाल विकासासाठी भरीव मदत, मध्यमवर्गीयांसाठी कर सवलती, आयआयटी आणि एआयएमएस संस्थांचा विस्तार, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया आणि तंत्रज्ञान विस्तार या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही परभणी जिल्ह्याला भरपूर तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा पालकमंत्री बोर्डीकर यांनी व्यक्त केली.