वाचनसंस्करातून बालके संवेदनशील, संस्कारक्षम आदर्श नागरिक घडतील- डॉ.समाधान पाटील
उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील;
पूर्णा शहरात रंगला बालवाचकांचा सन्मान सोहळा*
पूर्णा( प्रतिनिधी)
बालकांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत.वाचलेल्या पुस्तकावर गप्पा कराव्यात.वाचनाचे विविध अनुभव सांगावेत.वाचनाचे फायदे सांगून वाचन संस्कृती अधिकाधिक वाढण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. यावरील त्यांची मते,उपक्रम जाणून घेणारा,त्यांना अभिव्यक्त होण्याची संधी देणारा लेखनपीठ वाचनपीठ उपलब्ध करून देणारा कार्यक्रम म्हणजेच ‘चला उधळूया- रंग वाचनाचे’ या अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राच्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.
पूर्णा शहरातील अभिनव विद्याविहार प्रशालेत उत्कृष्ट बालवाचक गौरव सोहळा संपन्न झाला.त्याचाच एक भाग म्हणजे चालता बोलता… वाचनावर गप्पा, मला भावलेली पुस्तके ,बालकवींचे कवी संमेलन संपन्न झाले. पूर्णा तालुक्यातील पुस्तक वाचन स्पर्धेतील सहभागी बालवाचकांपैकी निवडक 55 बालवाचकांना सन्मानाचिन्ह, सन्मानपत्र ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.तसेच
शंभर टक्के विद्यार्थी,गावकरी आणि पालक यांनी सहकुटुंब वाचन करावे यांसाठी झटणाऱ्या खडाळा शाळेचा विशेष गौरव मुख्याध्यापक नागनाथ नागरगोजे आणि उपसरपंच कुंडलिक शिंदे यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देवून करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला रेड्डी तर प्रमुख पाहुणे म्हणून पूर्णा उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, गटशिक्षणाधिकारी बालाजी कापशीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर ,जगदीश जोगदंड , रमेश सूर्यवंशी , तानाजी बिराजदार,अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी समाधान पाटील म्हणाले की, अक्षर आनंद वाचन चळवळीमार्फत राबविले जाणारे सर्वच उपक्रम प्रेरणादायी असून यातून भविष्यातील संस्कारक्षम व संवेदनशील नागरिक बनतील.जगदीश जोगदंड यांनीही
बालवाचकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पूर्णा तालुका समन्वयक संतोष रत्नपारखे , सूत्रसंचालन मारुती डोईफोडे यांनी तर आभार विनायक पौळ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल अनमुलवाड ,श्रीमती गिरीजा सोनवळे, प्रतिमा मसारे , नागनाथ नागरगोजे ,लक्ष्मण गीते ,उमराव मोरे आदींनी परिश्रम घेतले.