परभणी;काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
उद्या संविधान बचाव यात्रा
परभणी/प्रतिनिधी:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पोखर्णी नृसिंह येथून कॉग्रेस पक्षाची सद्भावना पदयात्रा रविवार (ता.४) रोजी काढण्यात आली. यावेळी पक्षाचे गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री नितीन राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खासदार डॅा. कल्याण काळे, खासदार रविंद्र चव्हाण, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, रमेश बागवे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, परभणी शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, रामचंद्र दळवी, मुजाहिद खान, केदार साळुंके, बाळासाहेब देशमुख, अभय देशमुख, सुहास पंडित, वहीद भाई, सलीम भाई, निखील धामणगावे आदींसहीत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की,राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. परभणीतही अशाच एका घटनेने या भागात सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रकार झाला. राज्यातील सामाजिक तणाव कमी करण्याच्या हेतूने व सद्भावना आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी ही काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रा आयोजित केली आहे. याआधी बीड जिल्ह्यात मस्साजोग ते बीड, नागपूर आणि नाशिकमध्ये सद्भावना पदयात्रा काढण्यात आली तर काल परळीत सद्भावना सत्याग्रह करण्यात आला आणि आज परभणीत सद्भावना यात्रा काढली आहे. दरम्यान विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की, सत्ताधारी लोक राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण बिघडवत असताना काँग्रेस पक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली सद्भावना व सौहार्द वाढवण्याचे काम करत आहे. जनतेला लुबाडून उद्योगपती आणि ठेकेदारांची घरे भरण्याचे काम सुरु आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्ताने शेतक-यांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा सरकारी डाव आहे पण काँग्रेस तो यशस्वी होऊ देणार नाही.
ही सद्भावना यात्रेत उद्या सोमवारी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथली यांच्या उपस्थितीत संविधान बचाव यात्रा व अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलन संपन्न होणार आहे.या नंतर उपस्थितांनी दिवंगत विजय वाकोडे व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली.