परभणी;दहावीच्या निकालात मुलींची बाजी; निकाल ८९.२४ टक्के
परभणी(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या दहावी बोर्ड (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा) निकाल जाहीर झाला असून,परभणी जिल्ह्याचा निकाल ८९.२४ टक्के लागला आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे.
जिल्ह्यात इयत्ता दहावी वर्ग असलेल्या ४४१ शाळां पैकी ६६ शाळांचा निकाल शंभर टक्के एवढा लागला असून पाच शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. ९०.०१ ते ९९.९९ टक्के निकाल असलेल्या शाळांची संख्या १४९ , तर ८० ते ९० टक्के निकालाच्या ११६ शाळा तर ६६ शाळांचा निकाल हा १०० टक्के तर ५ शाळांचा निकाल हा शून्य टक्के एवढा लागला आहे.
जिल्ह्यात विशेष प्राविण्यप्राप्त म्हणजे ७५ टक्के पेक्षा अधिक गुण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या सहा हजार ९२५ आहे. प्रथमश्रेणी सात हजार ९८०, द्वितीय श्रेणीत सात हजार ६२२ तर दोन हजार ९८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलींनी निकालात बाजी मारली आहे. १२ हजार ९१३ पैकी १२ हजार १०५ मुली उत्तीर्ण झाल्या. ही टक्केवारी ९३.७४ टक्के आहे. तर १५ हजार ६७९ पैकी १३ हजार ४११ मुले उत्तीर्ण झाली. ही टक्केवारी ८५.५३ टक्के आहे.
मंडळातर्फे जुन-जुलै २०२५ मध्ये होणार्या पुरवणी परीक्षेसाठी, श्रेणीसुधार व खासगीरित्या प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार (ता.१५) पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच मंडळाने गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्रमुल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. ता. १४ ते २८ मे पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरता येणार आहेत.