बळीराजावर दुबार पेरणीचे संकट;पूर्णे १५ दिवसांपासून पावसाची ओढ
पूर्णा ता.२४ (प्रतिनिधी) मान्सुनपुर्व पावसाने धडाक्यात हजेरी लावली. मृगात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली.मात्र १५ दिवसांपासून पूर्णा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला असून असून, दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत.
यंदाच्या मोसमात जोरदार पडलेल्या मान्सुनपुर्व पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने वेळेत पेरणीच्या कामांना सुरुवात केली होती.अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे, खते, औषधे विकत घेत पेरण्या पूर्ण केल्या. मात्र आता पावसाच्या अभावामुळे या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि चिंता पसरली आहे तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, बाजरी कापूस, मूग व उडीद यासारख्या पिकांची पेरणी केली जाते. आतापर्यंत तालुक्यात ७० ते ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, उगम झालेल्या पिकांना आता जीवनदायी पावसाची अत्यंत गरज आहे. मात्र ढग आले, वारे वाहिले तरी पावसाचा थेंबही न पडल्यामुळे पिके करपण्याच्या अवस्थेत आली आहेत. शेतजमिनीत उगम झालेली रोपे उन्हाच्या तडाख्यामुळे वाळत चालली आहेत.
एका बाजूला निसर्गाची अवहेलना आणि दुसरीकडे महागाईच्या झळा यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. बियाण्यांचे दर, रासायनिक खते, औषधांची किंमत गगनाला भिडली असून, त्यातच पाणीटंचाईमुळे सिंचनाची सोयही नाही. काही शेतकऱ्यांनी विहिरीतून किंवा बोअरिंगमधून पाणी काढून पिके वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पूर्णा ् तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत.”गेल्या वर्षीही पावसाने दगा दिला. यंदा सुरुवातीचा पाऊस झाल्यावर आशा निर्माण झाली होती, पण आता पुन्हा आभाळ कोरडं राहिलंय. आता जर पाऊस लवकर आला नाही तर संपूर्ण पेरणी वाया जाणार. असल्याचे शेतकऱ्यातून सांगण्यात येत आहे सद्यःस्थितीत कृषी विभागाने पावसाच्या विलंबामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना तातडीची मदत, आर्थिक सवलती, पुनर्पेरणीसाठी बी-बियाण्यांची सोय आणि सिंचनाच्या उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात या संपूर्ण परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झालं असून, त्यामुळे प्रशासन आणि शासनाने तातडीने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी सर्वत्र होऊ लागली आहे.