अर्थसंकल्पातून बीड जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधीचा वर्षाव!
अर्थसंकल्पातून बीड जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधीचा वर्षाव!
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, पुरुषोत्तमपुरी यांसह भगवानगड, नारायणगड, गहिनीनाथगड विकासासाठी भरीव निधी
धनुभाऊंनी मानले अजितदादांचे आभार!
मुंबई (दि. ०८) —- : अर्थमंत्री ना. अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यातील स्नेह सर्वश्रुत आहे, याचाच परिपाक म्हणून बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात भरभरून तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधीचा वर्षाव करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास, माजलगाव येथील भगवान पुरुषोत्तम यांच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार व परिसराचा विकास, यासह जिल्ह्यातील नारायणगड, गहिनीनाथगड तसेच जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भगवानगड या तीर्थ क्षेत्रांच्या विकासासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नारायणगड, भगवानगड, गहिनीनाथगड आदी तिर्थक्षेत्रांचा दौरा करून त्याठिकाणी भरीव विकासनिधीच्या मार्फत विकासकामे हाती घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसताना देखील जिल्ह्यातील महत्वाची मानली जाणारी ही तीर्थस्थळे विकसित करण्यासाठी निधी खेचून आणण्यात ना मुंडेंना यश आले आहे.
दरम्यान अजितदादा व धनुभाऊ यांची मैत्री सर्वश्रुत असल्याने बीड जिल्ह्याच्या वाट्याला यंदा विशेष निधी येईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती व त्यानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध योजनांसह जिल्ह्यातील प्रमुख तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धनुभाऊंनी अजितदादांचे बीड जिल्हा वासीयांच्या वतीने आभार मानले आहेत.
माजलगाव चे आमदार प्रकाश दादा सोळंके, आष्टी पाटोदा चे आमदार बाळासाहेब आजबे काका , बीड चे आमदार संदीप भैया क्षिरसागर , विधान परिषद सदस्य संजय भाऊ दौंड, माजी आमदार अमरसिंह पंडित यांनीही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले आहेत












