परभणी;लाखों मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत तब्लीगी इज्तेमाचा समारोप
परभणी/प्रतिनिधी
दोन जिल्ह्यातील समाज बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तब्लीगी इज्तेमाचा गुरुवारी २ रोजी लाखों मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत समारोप झाला.यावेळीप्रेषित मोहम्मद पैंगबर व कुराणाने दिलेल्या शिकवणीसह संदेशाचे प्रत्येक मुस्लिम बांधवाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरण केले पाहिजे, एकमेकां विषयीची आस्था बाळगून परस्परातील प्रेम, नाते दृढ केले पाहिजे, त्याद्वारे कौटूंबिक व सामाजिक स्वास्थ्य राखले पाहिजे, असा सूर तब्लिगी इज्तेमाच्या समारोपीय दिवशी हजेरी लावलेल्या नामवंत मौलवींनी व्यक्त केला.
परभणी आणि हिंगोली या दोन जिल्हयासाठी जिंतूर रस्त्यावरील सुमारे ८० एक्करवर मुस्लिम बांधवांच्या तब्लिगी इज्तेमास बुधवारी सकाळ ७ वाजता प्रारंभ झाला. गुरुवारी सकाळी फजरच्या नमाज नंतर भरगच्च कार्यक्रमांना दुसर्या दिवशी सुरुवात झाली. विशेषतः विविध सत्रात मौलवींनी विविध विषयात मोलाचे मार्गदर्शन केले. दुपारी जोहरच्या नमाजानंतरच्या सत्रातसुध्दा इस्लाम धर्माची शिकवण व त्याचे महत्व यावर मौलवींनी सुंदर असे विवेचन केले. त्याचप्रमाणे कुराण व हादीस नुसार प्रत्येक मुस्लिम बांधवाने आपले जीवन कसे जगले पाहिजे, कौटूंबिक व सामाजिक स्वास्थ्य कसे राखले पाहिजे, याविषयी यथायोग्य मार्गदर्शन केले. प्रेषित मोहम्मद पैगंबर व कुराणाने दिलेल्या शिकवणीसह संदेशाप्रमाणेच प्रत्येक मुस्लिम बांधवाने जगावे, तरच समृध्द असे जीवन जगता येईल, असे म्हटले.
तब्लिगी इज्तेमाच्या दुसर्या म्हणजे समारोपाच्या दिवशी या दोन जिल्ह्यातील लाखोबांधवांनी पहाटेपासून सकाळी इज्तेमास्थळी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा ८० एक्करातील मुख्य मंडपासह संपूर्ण परिसर त्यामुळे अक्षरशः गजबजला होता. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तसेच खेड्या पाड्यातील बांधवांनी ग्रुपने, मिळेल त्या वाहनाने तब्लिगी इज्तेमाचे स्थळ गाठून दिवसभरातील कार्यक्रमांना हजेरी लावून सहभाग नोंदवला.अतीशय शिस्तबध्द पध्दतीने, संयोजन समितीने दिलेल्या सूचनांप्रमाणे या मुस्लिम बांधवांनी दुसर्या दिवशीही दिवसभरात शिस्तीचे प्रदर्शन केले. सायंकाळी या तब्लिगी इज्तेमाचा समारोप झाला.परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील काना कोपर्यातील मुस्लिम बांधवांनी गुरुवारी पहाटेपासून दुपारपर्यंत तब्लिगी इज्तेमाचे स्थळ गाठून हजेरी नोंदवली. त्यासाठी दिवसभर आपआपले दैनंदिन व्यवहार पूर्णतः बंद ठेवले. त्यामुळे परभणी शहरासह जिल्ह्यातील ठिकठिकाणचे बाजारपेठेतील व्यवहार पूर्णपणे बंद होते, ठप्प होते.