समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण;तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कार्यालये पडली ओस

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेले समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचारी गेल्या वीस वर्षांपासून कंत्राटावर आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील संतप्त कर्मचारी चार मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन करत आहेत.

सुरवातीला सर्व शिक्षा अभियान असे नाव असलेले अभियान आता समग्र शिक्षा म्हणून ओळखले जाते. यामध्ये साडेतीन हजार कर्मचारी २००२ पासून कंत्राटावर आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत कुणी जिल्हास्तरावर, कुणी तालुका स्तरावर तर कुणी महापालिकेच्या अखत्यारीत काम करीत आहेत.

सहायक कार्यक्रम अधिकारी, विषय साधन व्यक्ती, कनिष्ठ अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एमआयएस कॉर्डिनेटर, संशोधक सहायक, लेखा सहायक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.परंतु कंत्राटावर व तुटपुंज्या मानधनावर असल्याने त्यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता आम्हाला शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यासाठी समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या नेतृत्वात चार मार्चपासून कामबंद आंदोलन केले जात आहे. विशेष म्हणजे, याच अभियानातील समावेशित शिक्षण या उपक्रमातील कर्मचाऱ्यांना नुकतेच कायम करण्यात आले आहे. तोच न्याय आपल्यालाही मिळावा, अशी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची आता मागणी आहे.

या कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत शासनाने अभ्यास समिती गठित केली आहे. परंतु, या समितीची अद्याप एकही बैठक झाली नाही. त्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. चार मार्चपासून कामबंद आंदोलनात सहभागी होत हे कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. पूर्णा येथील गटसाधन केंद्र पूर्णा येथील नऊ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

You cannot copy content of this page