पायी दिंडीतील वारकर्याचा अपघाती मृत्यू
मयत वारकरी पूर्णा तालुक्यातील महागाव येथील रहिवाशी;जेजुरी येथे घडली दुर्देवी घटना;शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. पूर्णा ता.२७(प्रतिनिधी)परभणीच्या ताडकळस येथुन जवळच असलेल्या महागाव येथील एका तरुण वारकर्याचा जेजुरी येथे अपघात होऊन पायी दिंडीतच मुत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार २५ जुन रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने महागावसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे. या दिवशी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भागातुन विठ्ठल नामाचा गजर करीत हातात टाळ, मृदंग, वीणा घेऊन पायी दिंडीत हजारो भाविक भक्त सहभागी झाले आहेत. दरवर्षी पालम तालुक्यातील खोरस येथुन पंढरपूर येथे पायी दिंडी जाते. या वारीत महागाव येथील विष्पु मारोती जाधव (वय ३२ वर्षे) हे आपल्या आई वडिलांसोबत पायी वारीत सहभागी झाले होते. परंतु बुधवारी ही पायी दिंडी ही जेजुरी येथे आली होती. रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास विष्णू जाधव यांना वाहनाचा धक्का बसला.या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना महागाव येथे समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्यातील सासवड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करुन शवविच्छेदन करण्यात आले. नोंद करण्यात आली असून शुक्रवार २७ जुन रोजी सकाळी ११ वाजता महागाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, तीन बहीणी असा मोठा परिवार आहे.