परभणीत पावसास सुरुवात; शेतकऱ्यांत समाधान
-पुरेशा पावसानंतरच पेरणीचे प्रशासनाचे आवाहन
परभणी/प्रतिनिधी
जिल्ह्यात कालपासून मान्सूनच्या पावसात सर्वदूर सुरुवात झाली आहे. त्यामुळे मागील तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसात सुरुवात झाली असली तरी किमान शंभर मिलीमीटर पर्जन्यमान होईपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळात बुधवारी मान्सूनच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. परभणी, जिंतूर तालुक्यात सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाल्याने मागील अनेक दिवसांपासून कडक ऊन पडल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सुखावला.
परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात पाच लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रांवर खरीप पिकांचे पेरणी होते. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, बाजरी या पिकांचे मोठे क्षेत्र आहे. त्यातही सोयाबीन आणि कापसाचे प्रत्येकी दोन लाखावर क्षेत्र आहे. यंदा जून महिना संपायला आला तरी पुरेसा पाऊस न केसळल्याने शेतकरीवर्ग चिंतेत होता. खरीप हंगामपूर्व सर्व तयारी दरम्यानच्या शेतकऱ्यांनी पूर्ण केली. त्यानंतर प्रतीक्षा होती ती मोठ्या पावसाची. मात्र मृग नक्षत्र न कोसळल्याने पेरणी कधी होते ?याबाबत शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यामुळे कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी साडेनऊशे मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. तर जून महिन्यात सरासरी १२६.२ मिलिमीटर एवढा पाऊस होतो. मात्र यंदा जून महिन्यात पावसाची मोठी तूट नोंदविली गेली. केवळ ४०.३ मिलीमीटर पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यामध्ये बेमोसमी पावसाचा समावेश होता. जून महिन्यात ६० टक्के पेक्षा अधिक पावसाची तूट नोंदविल्या गेली आहे.
–तीन दिवसांचा यलो अलर्ट जारी
मान्सूनची वाटचाल मोठ्या गतीने सुरू असून परभणी जिल्ह्यात बुधवारी(दि. २४)ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी परभणी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर पुढील शनिवार(दि. २७)पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.











