परभणी;जिंतूरमध्ये स्मार्ट मिटर विरोधात जनक्षोभ

Spread the love

माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा आक्रमक पवित्रा; भारनियमन कमी करण्याचीही मागणी

जिंतूर,ता.१५(प्रतिनिधी)

परभणीतील जिंतूर तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी, अशी ठाम मागणी माजी आमदार विजयरावजी भांबळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली संभ्रमाची व असंतोषाची भावना लक्षात घेऊन ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

निवेदनात नमूद करण्यात आले की, ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय कोणत्याही घरात किंवा व्यावसायिक आस्थापनात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये. मीटर बदलण्यापूर्वी प्रत्येक ग्राहकाला लेखी स्वरूपात किंवा एसएमएसद्वारे पुरेशी पूर्वसूचना देण्यात यावी. तसेच स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याबाबत महावितरणने लेखी हमी द्यावी.

स्मार्ट मीटरच्या वापरामुळे बिलिंग पद्धत, रीडिंग प्रणाली आणि तांत्रिक बाबींविषयी अनेक शंका नागरिकांच्या मनात असल्याने यासंदर्भात सार्वजनिक जनजागृती मोहीम राबविण्याची मागणीही करण्यात आली. मीटरमध्ये बिघाड झाल्यास किंवा चुकीचे वीजबिल आल्यास त्याच्या तातडीच्या निवारणासाठी स्वतंत्र आणि जलद तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, अशीही मागणी करण्यात आली.

मीटर बदलताना जुन्या आणि नव्या मीटरचे रीडिंग ग्राहकाला लेखी स्वरूपात देण्यात यावे, जेणेकरून भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही. तसेच स्मार्ट मीटर संदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय येईपर्यंत ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

यावेळी जिंतूर शहरासह ग्रामीण भागातील विजेच्या विविध समस्यांकडेही महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा, तांत्रिक अडचणी तसेच वाढते भारनियमन यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असल्याचे सांगून भारनियमन कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

या प्रसंगी विश्वनाथ राठोड, अजय चौधरी, कृष्णकांत देशमुख, शंकर जाधव, माणिक हरकळ, लक्ष्मण बुधवंत, बाळासाहेब भांबळे, मुरलीधर मते, गणेश इलग, अविनाश मस्के, कैलास महाराज, विठ्ठल घोगरे, राजेश चव्हाण, माधव घोगरे, जाबीर मुल्ला, करीम लाला, अशोक बंड, मनोहर डोईफोडे, दत्ता काळे, शौकत लाला, रफिक बेग, अभिजित भांबळे, सचिन राऊत, विश्वंभर पवार, राहुल घुले, प्रवीण चव्हाण यांच्यासह जिंतूर शहर व ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.नागरिकांच्या भावना व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

You cannot copy content of this page