परभणी;येलदरी जलाशयाचे १० दरवाजे उघडले..

Spread the love

पूर्णा नदीपात्रात २३ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

पूर्णा/प्रतिनिधी:
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शनिवारी १९ऑक्टोंबर रोजी जलाशयाचे दहा दरवाजे दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ०.५ मिटरने उघडण्यात आले आहेत.पूर्णा नदीपात्रात २३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.. प्रशासनाच्या पुर नियंत्रण विभागाच्या वतीने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा दिला असून नदीपात्रात कोणीही जाण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन केले आहे.
परभणी, हिंगोली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या येलदरी जलाशयावर बहुतांश शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याची मदार आहे.यंदाच्या मोसमात जलाशय पुर्ण क्षमतेने भरल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेती सिंचनाचाही प्रश्न निकाली लागला आहे. येलदरी धरणाचा एकूण पाणीसाठा ९३४ दस लक्ष घनमीटर असून धरणाचा मृतसाठा १२४ तर जिवंत पाणीसाठा ८०९ दसलक्ष घनमीटर आहे. आज रोजी धरणात जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी १०० टक्के झाली आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील खडक पूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने येलदरी जलाशयात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने शनिवारी तातडीने प्रकल्पाचे १० दरवाजे उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. उघडण्यात आलेल्या दरवाजामधुन तब्बल २३ हजार ७०० क्यूसेस पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. प्रशासनाने वीज निर्मितीचे संच कार्यान्वित केली असून यातून विजनिर्मीती केली जाते आहे. जलाशयातील पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने सेनगाव रस्त्यावरील पुलावर निसर्ग प्रेमी नागरिकांनी हा नयनरम्य दृश्य पहाण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

————+———-

सतर्कतेचा ईशारा
येलदरी धरणाच्या खालोखाल सिद्धेश्वर धरण आहे. सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे,तसेच येलदरीचे धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने सिद्धेश्वर प्रकल्पातून ही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.पूर्णा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे.त्यामुळे पूर्णा तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.नदीपात्रात कोणीही उतरु नये आपली जनावरे सांभाळावीत असे आवाहनही केले आहे.

You cannot copy content of this page