Breking News; नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत ६ ऑक्टोबरला..!
२४७ नगरपरिषद व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांसाठी ठरणार आरक्षण;निवडणुकीच्या रणधुमाळी सुरुवात होण्याची चिन्हे;ईच्छुक उमेदवारांत धाकधूक
परभणी ता.३ (प्रतिनिधी) मागील ५ वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याचं चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे.पालीकेच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्यात अंतिम प्रभाग रचनेचा कार्यक्रम पूर्ण झाला असून,आता निवडणुक आयोगाने नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. राज्य शासनाने यासाठी आरक्षणाची सोडत येत्या सोमवार(ता.६) ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालयातील ६ वा मजला येथे, मुंबई येथील परिषद सभागृह, आयोजित केली आहे.या सोडतीत २४७ नगरपरिषद व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण ठरवले जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय समीकरणात महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रका नुसार, सुरक्षिततेच्या कारणास्तव मंत्रालयात प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या सोडतीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे फक्त दोन प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी अधिकृतरित्या त्या प्रतिनिधींची नावे शासनाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी या संदर्भातील पत्र शुक्रवारी (ता.३) ऑक्टोबर रोजी सर्व मान्यवर पक्षांना पाठविले आहे.
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या सोडतीकडे सर्व राजकीय पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण व शहरी भागातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने ही सोडत अत्यंत निर्णायक मानली जात आहे.












