पोलीस पाटील संघटनेचे प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबई मंत्रालयात पार पडली महत्वपूर्ण बैठक
परभणी,ता३०(प्रतिनिधी) राज्यातील पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,गृहराज्यमंत्री योगेश कदम, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर तसेच गृह विभागाचे अव्वल सचिव बिकनी ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. या भेटीत मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी संघटनेने मागणी केली आहे.

परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर व सुरेश भुंबरे यांच्या नेतृत्वाखाली गाव कामगार (पोलीस पाटील) संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके पाटील, संस्थापक सदस्य ज्ञानोबा काटकर पाटील, परभणी जिल्हा अध्यक्ष राहुल डोंगरे पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष रवींद्र जाधव पाटील, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव चव्हाण पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरेश देंडगे पाटील आणि गंगाखेड तालुका अध्यक्ष शिवराज गवळी पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृह राज्यमंत्री,गृह सचिव यांची (ता.२८) रोजी भेट घेऊन निवेदन देत शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. विशेष म्हणजे, पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करून ते ६,५०० रुपयांवरून १५,००० रुपये करण्यात आले याबद्दल संघटनेने सरकारचे आभार मानले. पोलीस पाटील यांचे निवृत्ती वय ६० वरून ६५ वर्षांपर्यंत वाढवावे, अनुकंपा धोरण लागू करावे, पोलीस पाटील पदाचे नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करावे, पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विमा लागू करावा, नोकरभरतीत ५ टक्के आरक्षण द्यावे, निवृत्तीनंतर २५ लाख रुपयांची एकरकमी रक्कम देण्यात यावी.अश्या प्रलंबित मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावव्यात असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.या सर्व मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.












