अल्पवयीन मुलीस पळविले ल्याचे प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस सुनावली ३ वर्ष कारावासाची शिक्षा
-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
परभणी/प्रतिनिधी
अल्पवयीन असणार्या मुलीस पळवून नेल्याबद्दल आशिष रणखांबे या २० वर्षीय तरुणास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सदरानी यांनी तीन वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.
दैठणा पोलिस ठाण्यात १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी एक तक्रार दाखल झाली. त्या तक्रारकर्त्याने त्यांची अज्ञान असणारी मुलगी कोणतरी अज्ञात कारणावरुन पळवून नेली आहे, असे नमूद केले. तपासिक अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक ज्योती बडेगावे यांनी तपास केला व आरोपी आशिष रणखांब रा. साळापुरी यास ताब्यात घेतले. त्याने या मुलीस आमिष दाखवून नाशिकला पळवून नेले. ती अज्ञात आहे हे माहित असतांनासुध्दा तीच्या सोबत राहिला. दरम्यान, या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षातर्फे खटला उभा करण्यात आला. साक्षीदार तपासल्या गेले. त्यातून संबंधित आरोपीने आई-वडिलांच्या सानिध्यात असणार्या मुलीस पळवून नेल्याचे सिध्द झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सदरानी यांनी या आरोपीस वरील शिक्षा ठोठावली. दरम्यान, या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. अॅड. अभिलाषा पाचपोर यांनी सहकार्य केले. कोर्टपैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल फातेमा शेख, वंदना आदोडे, सचिन धबडगे यांनी या प्रकरणात काम पाहिले.









