‘विश्वदीपला’ न्याय मिळवून देण्यासाठी पुर्णा पालीकेला ठोकले कुलूप
पालिकेच्या निष्काळजी कारभारा विरोधात संताप;मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची
पूर्णा ता.२९ (प्रतिनिधी) : शहरातील पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून नालंदा नगरातील विश्वदीप संतोष कांबळे या १० वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने पूर्णा शहर हादरले असून प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर तब्बल बारा तास उलटून गेले तरीही कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. या निष्काळजी पणाविरोधात अखेर नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व नगरपरिषद कार्यालयाला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन छेडले.
“जबाबदार अधिकारी कुठे आहेत?”, “मृताच्या कुटुंबाला न्याय द्या”, “नगरपरिषदेला कुलूप ठोका” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अभियंता आणि संबंधित गुत्तेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करत ठिय्या आंदोलन केले. बांधकाम सुरू असताना कोणतीही सुरक्षेची खबरदारी न घेता खड्डा उघडाच ठेवण्यात आला आणि यामुळेच एका निष्पाप बालकाचा बळी गेला, हा प्रशासनाचा थेट निष्काळजीपणा असून अशा बेफिकीर अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून कंत्राटदारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली.संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाचे दरवाजे कुलूपबंद करत निषेधाची जाहीर नोंद केली.तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर, अँड.राजेश भालेराव,प्रताप कदम, देवराव खंदारे, सुनील मगरे, बाबा पठाण,मुन्ना राठोड,लक्ष्मीकांत शिंदे, मोहन गुंजकर, संजय वाघमारे,महेबूब तांबोळी, राज ठाकर, अँड गोविंद ठाकुर, विश्वनाथ होळकर, किशोर, सूर्यवंशी श्रीनिवास तेजबंद, श्याम महामुने, सुनील डुबेवार, धारबा गायकवाड यांच्यासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आली












