‘कठोर परिश्रम,नम्रता शिस्त यशाची गुरुकिल्ली’.. डॉ के.राजकुमार
पुर्णेत श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाचा “दिक्षारंभ सोहळा” संपन्न
पूर्णा (प्रतिनिधी):
“महाविद्यालयीन जीवन हे केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित नाही. हा काळ स्वतःचा शोध घेण्याचा, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचा आहे. इथे तुम्हाला उत्कृष्ट शिक्षक, अद्ययावत ग्रंथालय आणि अभ्यासाव्यतिरिक्त अनेक कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ मिळणार आहे. या सर्व संधींचे तुम्ही सोने केले पाहिजे”. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ के. राजकुमार यांनी केले.
पुर्णा येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या वतीने पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ राजकुमार बोलत होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आदर्श आचरण आणि नैतिकता कशी जोपासायची, तसेच महाविद्यालयाची उद्दिष्टे आणि ध्येय धोरणे, विविध सुविधा व भौतिक सुविधेबरोबर अनेक योजनाची अनेक कार्यक्रम व उपक्रम याबद्दल माहिती दिली.अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अमलबजावणी समितीचे समन्वयक प्रा. डॉ. संजय दळवी यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयात कार्यरत असलेल्या विविध समित्या आणि विभाग यांची सविस्तर माहिती देताना म्हटले की महाविद्यालयात अनेक विभाग आहेत जसे की विद्यार्थी कल्याण विभाग, एनएसएस विभाग, करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेल, सांस्कृतिक विभाग, हे विभाग विदयार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य करत असतात तसेच या सर्व विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी मदत होते.
उपप्राचार्य डॉ.जितेंद्र पुल्ले यांनी महाविद्यालयात असणाऱ्या करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेल विषयी माहिती सांगितली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे व्याख्यान ठेवले जातात. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात जर स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर त्यांना यूपीएससी व एमपीएससी सारख्या अवघड असणाऱ्या परीक्षेत निश्चित यश संपादन करता येईल असे डॉ पुल्ले म्हणाले. डॉ. प्रकाश भांगे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी महाविद्यात नियमित आल्यास त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि हेच ज्ञान भविष्यात यश संपादन करण्यासाठी मदत करेल. डॉ.अल्का कौसडीकार यांनी महिला तक्रार निवारण समिती संदर्भात संदर्भात माहिती देऊन त्याचे उद्देश व समितीच्या कार्याविषयी माहिती देऊन विद्यार्थिनींना काही अडचण असेल तर त्या संदर्भात निवारण करण्याची हमी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकासकक्ष प्रमुख डॉ. विजय पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभागाच्या डॉ.वृषाली आंबटकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.शिवसांब कापसे,डॉ.संतोष चांडोळे, डॉ.राजीव यशवंते, डॉ.सोमनाथ गुंजकर डॉ.अंबिका चोंडे डॉ.वर्षा धुतमल,प्रा.नसीर शेख डॉ.शिंदे यांची उपस्थिती होती. श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोदअण्णा एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव श्री गोविंद कदम, कोषाध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम यांनी सदरील कार्यक्रम घेतल्याबद्दल संयोजन समितीचे अभिनंदन केले.











