“टीईटी”चा पेपर फुटला;परीक्षा पुढे ढकलली.!
भिवंडीत पेपरफुटीचा प्रकार उघड; राज्यभरातून संताप व्यक्त
परभणी, ता. २७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (दि. २८) राज्यभर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर परीक्षा परिषदेकडून हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात दरवर्षी दोनदा घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो उमेदवार प्रविष्ट होत असतात. यंदाही राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. परभणी जिल्ह्यात तब्बल बारा हजारांहून अधिक उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. परीक्षा केंद्रे, सुरक्षा व्यवस्था तसेच अन्य प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली असतानाच पेपरफुटीचा प्रकार उघड झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भिवंडी येथे टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत असून, परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याबाबत पुढील सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती परीक्षा परिषदेने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.











