बेकायदा वीजचोरी प्रकरणी त्या कंत्राटदारांवर अखेर गुन्हा दाखल
पुर्णेतील टाकी बांधकामासाठी टाकला होता अकोडा;स्थानिक पत्रकारांच्या मागणीला यश
पूर्णा, ता.१२ (प्रतिनिधी)
पाणीपुरवठा योजनेतील पाण्याची टाकी तसेच जलशुद्धीकरण केंद्र बांधकामासाठी पालीकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने महावितरण कंपनीच्या वाहीन्यांवर अकोडा टाकुन दोन वेळा विज चोरी केल्यानंतर त्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी लावून धरत वारंवार वृत्त प्रकाशित केले पत्रकारांच्या मागणीला यश मिळाले असून,त्या कंत्राटदारांवर अखेर महावितरण कंपनीच्या वतीने (ता.११) रोजी गुन्हा दाखल केला आहे.
पुर्णा शहरातील पाणी पुरवठा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या डी.एस.मुरकुटे या कंत्राट कंपनीने शहरातील शास्त्रीनगर परिसरात सुरू असलेल्या नवीन पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्र बांधकामासाठी महावितरणच्या लघुदाब वीज वाहिनी वरून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदा आकडा टाकून वीज वापर केल्याचा प्रकार दोन वेळा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारास लोकप्रतिनिधी यांच्या दबावाखाली येऊन महावितरण कंपनीचे तसेच पालीकाप्रशासन अधिकारी थातुरमातुर कारवाई करुन पाठीशी घालत होते.मात्र वारंवार महासमाचार व काही स्थानिक माध्यमांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लावून धरली होती.याकरीता वारंवार वृत्तही प्रकाशित केले होते.अखेर महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता रामगीरवार यांच्या आदेशाने शहर अभियंता पाटील यांनी (ता.११) रोजी महावितरण कंपनीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीवरुन नगरपरिषद पूर्णा हद्दीत नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणाऱ्या डी.एम. मुरकुटे,वसमत येथील कंपनी विरोधात विजचोरी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट..
गुन्हा दाखल तरीही वीज चोरी सुरुच..!
मुजोर विजचोर डी.एस.मुरकुटे कंत्राटकंपनी पाणी टाकी बांधकामासाठी महावितरण कंपनीकडून अधिकृत विजपुरवठा न घेता परस्पर आकोडा टाकून विज चोरी करत असताना दोन वेळा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पकडले लाखोंचा दंडही आकारला.तरी या वीजचोर कंत्राटदार कंपनीने मात्र शास्त्रीनगर स्मशानभूमी परिसरातील टाकी बांधकामासाठी गुन्हा दाखल केल्यानंतरही आकडा टाकून विज चोरण्याचा फंडा सुरुच ठेवला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आता गुन्हा दाखल केल्यानंतर महावितरण काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.











